शांघाय: चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सरकारनं एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत, देशाचे प्रमुख राजकीय सल्लागार आणि माजी लष्करी कमांडर जनरल झाओ जोंगकी यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. डोकलाम संघर्ष आणि भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश दिल्यामुळे झाओ जोंगकी जगभरात चर्चेत आले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षावेळी ते चिनी सैन्याच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. भारताला धडा शिकवण्यासाठी त्यांनीच या गलवान ऑपरेशनला मंजुरी दिली होती, असा दावा अमेरिकेच्या गोपनीय अहवालात करण्यात आला होता. (General Zhao Zongqi)
चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सच्या सदस्यत्वावरून झाओ जोंगकी यांना हटवण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या इतर दोन प्रमुख पदांचाही ताढकाफडकी ताबा काढण्यात आला आहे. शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणि शिस्त व कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून इतर दोन वरिष्ठ जनरल, झांग युक्सिया आणि लियू झेनली यांनाही केंद्रीय सैन्य आयोगातून बडतर्फ करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/08/29/preparations-for-a-phased-resolution-to-the-india-china-border-dispute/
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, भारतावर दबाव वाढवण्यासाठी आणि अमेरिकेसह इतर देशांसमोर चीन कमकुवत दिसू नये, यासाठी जनरल झाओ यांनीच आक्रमक पवित्रा घेत गलवान ऑपरेशनला हिरवा झेंडा दाखवला होता. आता शी जिनपिंग यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयानंतर चीनच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (General Zhao Zongqi)
२०१७ मध्ये डोकलाम भागात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते, तेव्हा दोन्ही देशांमध्ये तब्बल ७२ दिवस तणाव सुरू होता. या संपूर्ण संघर्षाच्या काळात झाओ हे वेस्टर्न थिएटर कमांडचे नेतृत्व करत होते.
मे २०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषावर तणाव वाढला, तेव्हाही झाओ याच विभागाचे प्रभारी होते. त्यानंतर १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला, ज्यात भारताचे २० वीर जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीन संबंधांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला होता, ज्या अंतर्गत भारताने अनेक चिनी ॲप्सवर बंदी घालण्यासोबतच विमानसेवेवरही निर्बंध आणले होते.