Friday, August 28, 2026

Ahilyanagar News : शाळा सुटली अन् काळ बनून कार आली, सहा विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघे गंभीर

Ahilyanagar News : शाळा सुटली अन् काळ बनून कार आली, सहा विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघे गंभीर

Ahilyanagar News : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळेचे सहा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरसगाव-ब्राम्हणगाव रोडवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

नेमकं काय घडलं ?

गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणगाव वेताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्याने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी माळेवाडीकडून श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने शाळेपासून काही अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमी विद्यार्थ्यांची नावे

या अपघातात केशव आकाश बर्डे, (वय ६) , आकांक्षा आकाश बर्डे, (वय ९ ), वैभव अमोल बर्डे, (वय ६). प्रीती अमोल बर्डे, (वय ८ , प्रांजल बाळासाहेब तोरणे, (वय ७) आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे, (वय १२) हे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील केशव आकाश बर्डे आणि वैभव अमोल बर्डे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघात नेमका कशामुळे झाला? कारचा वेग किती होता? आणि चालकाची नेमकी जबाबदारी काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कार चालक कोण ?

दरम्यान, अपघातातील कारच्या चालकाबाबतही परिसरात चर्चा सुरू आहे. माळेवाडी येथील एका शाळेचे शिक्षक दररोज आपल्या स्विफ्ट डिझायर कारमधून काही शिक्षकांना सोबत घेऊन ये-जा करत असल्याचे सांगितले जाते.गुरुवारीही नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ते माळेवाडीहून ब्राह्मणगाव वेताळमार्गे इंदिरानगरकडे येत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कार एक महिला चालवत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कार चालवणारी महिला नेमकी कोण होती ? अपघाताच्या वेळी प्रत्यक्षात वाहन कोण चालवत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर वाढणारी वाहतूक आणि वाहनांचा वेग लक्षात घेता, शाळांच्या परिसरात वेगमर्यादा लागू करणे, वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करणे, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे तसेच पोलीस बंदोबस्त वाढवणे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >