महापलिकेच्यावतीने ९.२३ कोटींची निविदा जारी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या यशानंतर महापालिकेने मंगळवारी टप्पा २अ साठी ९ कोटी २३ लाख रुपयांची निविदा काढली. या टप्प्यात काळा घोडा परिसरातील चार रस्त्यांचे रस्ते, पदपथ, जलनिस्सारण व्यवस्था, सुशोभीकरण आणि पथदिव्यांशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. या टप्प्यात चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ब्स स्ट्रीट, नागीनदास मास्टर रोड आणि नानीक मोटवानी रोड या चार रस्त्यांचा समावेश आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन मुंबईकरांसमोर आलेल्या मुंबई ...
काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाच्या जुलै महिन्यात झाले. या टप्प्यात व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रदरफर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा रोड यांचा पादचारीस्नेही पद्धतीने विकास करण्यात आला. या रस्त्यांवर सुधारित प्रकाशव्यवस्था, खुल्या जागेतील कॅफेची आसनव्यवस्था आणि सुशोभित सार्वजनिक जागा निर्माण करण्यात आल्या आहेत.
या सुशोभिकरणाच्या टप्पा २अ अंतर्गत आता आणखी काही रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये बेसाल्ट आणि ग्रॅनाइटच्या कोब्बलस्टोनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच हे रस्ते शनिवार-रविवारी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्यात आला असल्याची माहिती भाजप नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी दिली आहे.
रस्ते कामांसह विविध सुविधा
टप्पा २अ मध्ये रस्ते विकासाची विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये कामाच्या ठिकाणाची साफसफाई, तात्पुरत्या संरचना हटविणे, आवश्यक सेवांच्या वाहिन्या तसेच पथदिवे, वाहतूक सिग्नल आणि रस्त्यावरील दिशादर्शक फलक यांचे स्थलांतर करणे, उत्खनन करणे आणि रस्त्याचे विविध थर बांधणे आदी कामांचा समावेश आहे.
टप्पा २ब मध्ये भूमिगत वाहनतळ, पादचारी चौक
काळा घोडा प्रकल्पाच्या टप्पा २बमधील प्रस्तावित कामांची माहिती देताना नार्वेकर म्हणाले, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात काळा घोडा जंक्शन येथे भूमिगत वाहनतळ उभारण्यासोबतच पादचारी चौकाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही मकरंद नार्वेकर यांनी सांगितले. काळा घोडा प्रकल्प आणि रिगल जंक्शन सुशोभीकरण प्रकल्प हे कुलाब्याच्या एकूण पादचारीकरणाचा भाग आहेत. रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासोबतच परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कुलाब्यात अशा पादचारीस्नेही सुधारणा आवश्यक आहेत, असे मकरंद नार्वेकर म्हणाले.