मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर येथील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेली कामे, आवश्यक साहित्याची उपलब्धता, वाढीव कामे तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला.
मंत्री शिरसाट म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ४५० फूट ( पदपीठ १०० फूट व पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे. हे स्मारक देशासह जगभरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याने त्याची उभारणी जागतिक दर्जाची असावी, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. स्मारकाच्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. कामाच्या विविध टप्प्यांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यासाठी सक्षम व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ अध्यापक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ...
वाढीव काम व साहित्य उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही
प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. कामाची गती कायम ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार २४ तास कामकाजाचे नियोजन करून विविध एजन्सींमध्ये समन्वय साधावा, तसेच वाढलेल्या कामाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एमएमआरडीए प्राधिकरण यांना निर्देश देण्यात आले.
स्मारक परिसर संपूर्ण हरित परिसर म्हणून विकसित करण्यात येणार असून, येथे सुमारे १ हजार व्यक्तींची आसनक्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय आणि भूमिगत वाहनतळ यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच स्मारकाचे तीव्र वादळांसह नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, उर्वरित कामे गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, सहसचिव बागुल, दूरदृश्य प्रणालीद्वारे अनिल सुतार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.