मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
कोकण विभागात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विशेष अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या भागात दमट आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे.
नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली. विषारी वायूचा प्रभाव झाल्याने ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या विशेष इशारा देण्यात आलेला नाही. अनेक भागांत अद्याप पावसाची तूट असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून, पुढील एक ते दोन दिवस काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहू शकतो.
एकंदरीत, राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार नियोजन करावे.