Thursday, August 20, 2026

Vande Mataram Controversy : काँग्रेसने 'वंदे मातरम'बाबत मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी

Vande Mataram Controversy : काँग्रेसने 'वंदे मातरम'बाबत मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरही साधला निशाणा

मुंबई : काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताबाबत मंजूर केलेला ठराव पूर्णपणे संविधानविरोधी असून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय अमान्य करणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम'बाबत नुकताच एक ठराव मंजूर करत या गीताची दोन कडवीच गाण्याबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आता देशात ब्रिटिशांचे राज्य नसून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला प्रत्येक निर्णय हा संवैधानिक असतो. मात्र, संसदेचा निर्णय मानणार नाही आणि गुलामीची परंपरा कायम ठेवू, असा पवित्रा काँग्रेस घेत असल्याचे यातून दिसून येते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. राहुल गांधी यांनी सरसकट सर्वसामान्य तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता, मात्र माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्याद्वारे संचालित महाविद्यालयांमधील मुलींचेच रजिस्ट्रेशन करून त्यांना या कार्यक्रमात आणले जात आहे, असा दावा त्यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतच्या निकषांचा पुनरुच्चार केला. योजनेच्या लाभासाठी करण्यात आलेल्या छाननीमध्ये आयकर भरणाऱ्या कुटुंबांचे अर्ज नियमात बसत नसल्याचे स्पष्ट झाले असून, पात्र आणि शंभर टक्के व्हेरिफाईड ठरलेल्या महिलांना सरकार असेपर्यंत नियमितपणे लाभ मिळत राहील, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >