Tuesday, August 18, 2026

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन 2026 - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेता संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण संजय दत्त यांनी स्वीकारले आहे. (Maha Walkathon 2026)

जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप मिळावे, हा वॉकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. (Sanjay Dutt)

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त 3 किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. वॉकेथॉन पूर्ण झाल्यानंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हास्तरावर गौरव केला जाणार आहे. (Soil and Water Conservation Department)

उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रथम 10 विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण 71,000 रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम क्रमांकाला 25,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 10,000 रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय सोडतीद्वारे 7 सहभागींची निवड करून प्रत्येकी 3,000 रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. (Save Soil Save Water)

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन हा उपक्रम राबवला जाणार आहे. 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून 21 ऑगस्टची ‘महा वॉकेथॉन’ जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >