Nashik Kumbh Mela : अमृतस्नानाच्या दिवशीही ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’ नाही, महासिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

Nashik Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये महासिंहस्थाच्या प्रमुख पर्वकाळात सुमारे १२ कोटी भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये अमृत स्नानासाठी सुमारे १.५ कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ७५ लाख भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विविध व्यवस्था उभारल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर अभूतपूर्व ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्थेप्रमाणेच दूरसंचार व्यवस्थेलाही अत्यावश्यक पायाभूत सुविधा मानून महासिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच उभारण्याचे नियोजन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.


‘प्रत्येक भाविक संपर्कात, प्रत्येक घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणि प्रत्येक अधिकारी संपर्कात’, हे या व्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून, अमृतस्नानाच्या दिवशीही ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’ होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.



पाचस्तरीय दूरसंचार व्यवस्था


महासिंहस्थाच्या तंत्रज्ञान आराखड्यानुसार, दूरसंचार व्यवस्था केवळ मोबाइल नेटवर्कपुरती मर्यादित न ठेवता पाच स्तरांवर उभारण्यात येणार आहे. पहिल्या स्तरावर सार्वजनिक मोबाइल नेटवर्कची क्षमता वाढविण्यात येणार आहे. महासिंहस्थाच्या काळात वाढणारी कॉल, इंटरनेट आणि डेटा सेवांची मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त क्षमता निर्माण केली जाणार आहे. दुसऱ्या स्तरावर खासगी नेटवर्क आणि स्वतंत्र संपर्क व्यवस्था उभारली जाणार आहे. महत्त्वाच्या प्रशासकीय आणि कार्यान्वयनाशी संबंधित गरजांसाठी समर्पित संपर्क उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.


तिसऱ्या स्तरावर Mission-Critical Communication (MCX) व्यवस्था असेल. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि इतर प्रतिसाद यंत्रणांमधील संपर्क आपत्कालीन परिस्थितीतही सुरळीत राहावा, यासाठी तिचा वापर केला जाणार आहे.चौथ्या स्तरावर Managed Wi-Fi आणि Service Assurance, तर पाचव्या स्तरावर IP/Fibre Backhaul आणि Satellite Communicationचा पर्यायी आधार देण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या नेटवर्कवर ताण किंवा अडथळा निर्माण झाला तरी संपूर्ण संपर्क व्यवस्था ठप्प होणार नाही.



दूरसंचार व्यवस्थेला डिजिटल महासिंहस्थाची जोड


महासिंहस्थासाठी प्रस्तावित दूरसंचार व्यवस्था स्वतंत्र प्रकल्प म्हणून न उभारता संपूर्ण डिजिटल महासिंहस्थाच्या एकात्मिक यंत्रणेचा कणा म्हणून विकसित केली जाणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही, बस व आपत्कालीन वाहनांचे जीपीएस, वाहतूक सेन्सर्स, पूरस्थितीचे सेन्सर्स, पर्यावरणीय सेन्सर्स, ड्रोन व अँटी-ड्रोन यंत्रणा, पार्किंग कॅमेरे, आपत्कालीन कॉल बॉक्स, सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था आणि Variable Message Displays यांचा समावेश आहे. या यंत्रणांमधून मिळणारी माहिती प्रस्तावित एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्राशी (ICCC) जोडली जाणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास तिची माहिती तातडीने उपलब्ध होऊन संबंधित यंत्रणेला जलद प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.



भाविकांच्या मदतीला ‘कुंभदूत’


महासिंहस्थाच्या डिजिटल व्यवस्थेचा थेट लाभ भाविकांनाही मिळणार आहे. प्रस्तावित एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, मार्ग व घाटांची माहिती, पार्किंग व वाहतूक, आरोग्य व आपत्कालीन मदत, हरवले-सापडले केंद्र, निवास व्यवस्था, रेल्वे व बसची माहिती, हवामान व आपत्तीविषयक सूचना, गर्दीची माहिती तसेच स्वच्छता व सार्वजनिक सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे भाविकाला घाट कुठे आहे, पार्किंग कुठे करायचे, कोणता मार्ग वापरायचा, जवळची आरोग्य सुविधा कुठे आहे किंवा आपत्कालीन मदत कशी घ्यायची, यासाठी विविध माध्यमांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे.



अमृतस्नानाच्या दिवशी खरी कसोटी


महासिंहस्थातील सर्वाधिक आव्हानात्मक दिवस म्हणजे अमृतस्नानाचे दिवस. या काळात लाखो भाविक एकाच वेळी मोबाइल नेटवर्क, इंटरनेट, डिजिटल सेवा आणि माहिती यंत्रणांचा वापर करू शकतात. त्यामुळे सरासरी दिवसातील नेटवर्कची गरज लक्षात घेऊन नव्हे, तर अमृतस्नानाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या कमाल मागणीचा विचार करून दूरसंचार आराखडा तयार करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखादी घटना लक्षात येऊनही संबंधित अधिकाऱ्यापर्यंत माहिती पोहोचली नाही, तर प्रतिसादाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे या व्यवस्थेचा उद्देश केवळ भाविकांना ‘ऑनलाइन’ ठेवणे नसून घटना दिसणे, माहिती पोहोचणे आणि प्रतिसाद यंत्रणा संपर्कात राहणे हा आहे.



‘संपर्क व्यवस्था ही सुविधा नव्हे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा’


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “महासिंहस्थ २०२७साठी संपर्क व्यवस्था ही सुविधा नसून अत्यावश्यक पायाभूत सुविधा आहे. प्रत्येक भाविक संपर्कात राहावा, प्रत्येक घटना कमांड यंत्रणेला दिसावी आणि प्रत्येक प्रतिसाद पथक संपर्कात राहावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. अमृतस्नानाच्या सर्वाधिक गर्दीच्या दिवशीही संपर्क व्यवस्था सक्षम राहावी, यासाठी पाचस्तरीय दूरसंचार आराखडा तयार करण्यात येत आहे. सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांचा अनुभव अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे.”

Comments
Add Comment

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना