मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांना आता वेग देण्यात येणार आहे. केवळ कामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंत्रालयात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष दिसतील अशा पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रलंबित कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, अशी सूचना करण्यात आली. ( Mumbai Goa Highway)
- काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश मुंबई : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या ...
दरम्यान, नागोठणे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामासाठी आयआयटीची तांत्रिक मदत घेण्यात येत आहे. तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार असून, तोपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूंच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माणगाव बायपासवरील सुमारे ७.५ किलोमीटरपैकी ५.५ किलोमीटर मार्गावर २० ऑगस्टपासून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दोन किलोमीटर मार्गही वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
चिपळूण उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने साथ दिल्यास गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतर भागांतून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि निश्चित मुदतीत कामे पूर्ण करावीत, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.