सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 2 ते 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Sangli Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढा, सातारा येथे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील एका तीव्र वळणावर समोरासमोर आल्या. यावेळी दोन्ही बसमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. काही प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ...
अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिस आणि बचाव पथकाच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातामुळे रेणावी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही बस बाजूला करण्याचे काम सुरू केले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा वेग, घाटातील तीव्र वळण किंवा बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. अपघाताची अधिकृत माहिती आणि मृत-जखमींची संख्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.