Monday, August 10, 2026

Teacher Recruitment : शिक्षक मेगा भरतीत क्रीडा शिक्षकांची 4,860 पदे वगळली? उमेदवारांमध्ये संताप

Teacher Recruitment : शिक्षक मेगा भरतीत क्रीडा शिक्षकांची 4,860 पदे वगळली? उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : राज्यात 30 हजार 209 शिक्षक पदांची (Teacher Recruitment) मेगा भरती प्रक्रिया सुरू असतानाच क्रीडा शिक्षकांच्या पदांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या भरती प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांची तब्बल 4 हजार 860 मंजूर पदे पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे बीपीएड पात्रता असलेल्या आणि अभियोग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे.

सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना 11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, क्रीडा शिक्षकांसाठी एकही प्रवर्ग भरतीच्या यादीत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या बीपीएडधारकांसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. (Maharashtra Teacher Recuitment)

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 2 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 4 हजार 860 समूह साधन केंद्रांवर प्रत्येकी एक केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) पद मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी आणि शासकीय शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या पदांचा सध्याच्या भरतीत समावेश न झाल्याने शिक्षक महासंघाने राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्र सरकारकडून ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असताना शालेय क्रीडा शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका महासंघाने केली आहे.

दरम्यान, पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतच सर्व 4,860 क्रीडा शिक्षक पदांचा समावेश करावा आणि शिक्षण विभागाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्यासह सुभाष अंभोरे, विजय धनवडे आणि संपत गीते यांनी केली आहे.

विभागनिहाय क्रीडा शिक्षकांची मंजूर पदे अशी आहेत : पुणे 1,035, छत्रपती संभाजीनगर 909, कोकण 876, नाशिक 833, अमरावती 605 आणि नागपूर 602.

या भरती प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवताना तसेच तो लॉक करताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. या तांत्रिक समस्यांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >