Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे हे नाट्यगृह म्हणजे समाजाप्रती असलेली समर्पणाची कृती

महापालिकेच्या वतीने भायखळ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले गौरवोद्गार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कल्पनाशक्तीपेक्षा वास्तविकता अधिक प्रखरपणे मांडली आहे. कष्टकरी कामगारांची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेला संघर्ष आणि संघर्षातून उमटलेले समाजाचे प्रतिबिंब ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून उभारण्यात आलेले हे नाट्यगृह म्हणजे समाजाप्रती असलेली समर्पणाची कृती आहे, असे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. (Anna Bhau Sathe)



दक्षिण मुंबईतील भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून जवळ असणाऱ्या नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण शुक्रवारी ३१ जुलै २०२६ रोजी पार पडले. यावेळी माननीय मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या लोकार्पण सोहळ्याला उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, सभागृह नेता गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना गटनेता अमेय घोले, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, समाजवादी पक्ष गटनेता अमरीन अब्राहनी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी-सक्रे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, विशेष समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच उप आयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह मान्यवर, नागरिक, कलावंत, रसिक उपस्थित होते. ( Annabhau Sathe)



याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, भायखळा येथे उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाचा रंगमच सुरुवातीला नाट्यकलाकृतींसाठी अपुरा पडत होता. ही बाब लक्षात घेवून मुंबई महानगरपालिकेने नाट्यगृहाचे नूतनीकरण हाती घेतले. समाजाचे प्रतिबिंब उमटणाऱ्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे नाट्यगृह निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून सतत कामगारांच्या जीवनाचा संघर्ष मांडला. मानवी मनाच्या संवेदना अलगदपणे कागदावर उतरविल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह लोककलांमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून मुंबईत येवून त्यांनी जनसामान्यांच्या वेदनेला शब्दांतून प्रभावीपणे मांडले. त्यांच्या शब्दांमुळे तरुणाई संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरली. अण्णा भाऊ यांनी आपल्या गितांमधून अन्यायाला वाचा फोडली. महाराष्ट्रासह गोवामुक्ती संग्रामातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या साहित्यातही हा जीवंतपणा उमटलेला असल्याने तब्बल २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे. त्यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या या नाट्यगृहाचा समाजातील शेवटच्या माणसाला देखील फायदा झाला पाहिजे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. (Marathi Culture)



कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वाहून घेतले. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहातून मराठी संस्कृतीचा, कलेचा गौरव केला जाणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सिंहाचा वाटा उचलला. या आंदोलनाची मशाल त्यांनी आपल्या प्रखर शब्दांनी पेटविली होती. अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांचे साहित्य आहे. या नाट्यगृहात कलाकार येतील, कलाकार घडतील, विचारांचा - साहित्याचा प्रसार होईल, असे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. (Lokshahir Annabhau Sathe)



तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्तविक मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. त्या म्हणाल्या, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कष्टकऱ्यांचे आयुष्य आपल्या शब्दातून मांडत साहित्यनिर्मिती केली. त्यांचे साहित्य सातासमुद्रापार पोहोचले. रशियातील मॉस्को येथेही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. कष्टकरी समाजाचे दु:ख खूप जवळून पाहिल्यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊंनी या दु:खाला साहित्यातून वाट करून दिली. मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे नाट्यगृह सांस्कृतिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरण्यासोबतच, वेगवान डिजिटल युगातही आपण लोकसंस्कृतीशी जोडले जावू, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस आभार मानले. कार्यक्रमादरम्यान शाहीर सुनील साठे यांनी आपल्या पहाडी आवाजात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची गाणी, पोवाडे सादर केले.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदालन


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मृतिदालन या नाट्यगृहाच्या तळमजल्यावर उभारण्यात आले आहे. याठिकाणी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. तसेच स्मृतीदालनात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, सुभाषिते, लावणी, गाणी, शाहिरी प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या छायाचित्रासह सामाजिक संदेशही प्रदर्शित करण्यात आले आहेत.


असे आहे नाट्यगृह


भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचा पुनर्विकास करून सन २०२१ मध्ये बंदिस्त नाट्यगृह बांधण्यात आले आहे.

अत्याधुनिक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणेसह ७६१ आसनक्षमतेचे सुसज्ज वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात आले आहे. नूतनीकृत नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी २१ मीटर आहे आणि लांबी ११ मीटर इतकी आहे. नाट्यगृहात क्रायरूम (लहान बाळांसाठीची खोली), ग्रीन रुम्स, दोन मेकअप रुम्स यांची सुविधा उपलब्ध आहे.
नाट्यगृहामध्ये विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या विद्युत जनित्राची सुविधा आहे. संकुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

सुसज्ज वाहनतळ


नाट्यगृहाच्या तळघरात सुमारे ३२ चारचाकी वाहने उभी करण्याची क्षमता असलेल्या सशुल्क यांत्रिकी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे. तर पहिल्या मजल्यावर प्रेक्षकांसाठी उपाहारगृहाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त मोकळी जागा आहे. तसेच नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र कार्यालय देखील या ठिकाणी आहे.
Comments
Add Comment

Mumbai Tourism : मुंबईत आणखी पर्यस्थळे स्थळे विकसित करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत पर्यटनाची मोठी क्षमता,

BMC : महापालिका शालेय इमारतींची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या कंत्राट कामांना मुदतवाढीचा शाप

जुन्या कंपन्यांवर प्रशासनाची मेहेरनजर.. कंत्राट संपून वर्ष उलटले तरीही नवीन नाही टेंडरचा नाही पत्ता मुंबई

नद्यांमधील गाळातून निघणारी वाळू आणि माती मोफत वाटणार

महसूल विभागाची नवी मार्गदर्शक नियमावली; शेतकऱ्यांना माती, तर घरकूल लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रासपर्यंत मोफत

ZP Elections : राज्यातील रखडलेल्या 'झेडपी' आणि पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये?

- राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र; ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची

Mantralaya Canteen : मंत्रालयातील कँटीनच्या फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ!

- उच्च न्यायालयाने 'एफडीए'ला सुनावले; सरकारी उपहारगृहे आणि खासगी आस्थापनांना वेगळा न्याय लावू नका मुंबई :

Pink e-rickshaw : 'पिंक ई-रिक्षा' योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ

 महिलांना आता मिळणार ४० टक्के अनुदान; जुन्या लाभार्थ्यांनाही वाढीव सवलतीचा फायदा मुंबई : राज्यातील महिलांना