मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क यंदा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे गणेशभक्तांना एसटीने अधिक स्वस्तात गावी जाता येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी या निर्णयाची माहिती दिली. गणेशोत्सव आणि एसटी महामंडळाचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून दरवर्षी हजारो कोकणवासी गणेशोत्सवासाठी एसटीने आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे पाच हजार एसटी बसचे आरक्षण केले जाते. (Pratap Sarnaik)
नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर दुसऱ्यांदा डोपिंग नियमांचे उल्लंघन ...
प्रवाशांना त्यांच्या गावी सोडल्यानंतर या बस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे महामंडळाला इंधनासह चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती तसेच कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या निर्णयामुळे गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार असून एसटीच्या गट आरक्षणाला यंदा अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव मंडळे आणि कोकणवासीयांकडून हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. यासंदर्भातील निवेदनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आली होती. कोकणवासीयांची मागणी आणि गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. (Pratap Sarnaik)
अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिक भार वाढणार आहे. हा भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.