Wednesday, July 29, 2026

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत; २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेचे मोठे यश

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत; २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेचे मोठे यश

मुंबई : अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेला मुंबई-पुणे रेल्वे संपर्क अखेर पूर्णपणे पूर्ववत करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. कर्जत-लोणावळा या अतिशय कठीण घाट विभागातील अप, डाऊन आणि मध्य असे तिन्ही रेल्वे मार्ग यशस्वीरीत्या दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. ११,७४५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या २३ दिवसांच्या अहोरात्र परिश्रमातून आणि तब्बल १,४०,९४० 'मॅन-आवर्स'च्या कामातून हे आव्हान पेलण्यात आले. ( Mumbai Pune Railway)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी ३२७ मिमी आणि ६ जुलै रोजी ६०० ते ६७० मिमी इतक्या विक्रमी पावसामुळे लोणावळा-कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे अप, डाऊन आणि मध्य या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, काहींचे मार्ग बदलण्यात आले, तर काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात आले. या संपूर्ण परिस्थितीचा सुमारे ६६५ गाड्यांवर परिणाम झाला. (Mumbai Pune Train)

सततच्या मुसळधार पावसामुळे मलबा हटविल्यानंतरही नव्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या. धोकादायक उतारांवर आणि पावसामुळे पडलेल्या भेगांवर मोठ्या प्रमाणावर ताडपत्री अंथरून मातीची धूप रोखण्याचे काम करण्यात आले.

या नैसर्गिक आपत्तीत खंडाळा-मंकी हिल अप मार्गावर १३० मीटर लांबीच्या पट्ट्यात चार मीटरपर्यंत जमीन खचली होती. मंकी हिल-ठाकूरवाडी डाऊन मार्गावर २०० मीटर उंच टेकडीवरून कोसळलेल्या दरडीमुळे संरक्षक भिंत कोसळून ५० मीटर लांबीचा रेल्वे मार्ग तब्बल २० मीटर खोलीपर्यंत वाहून गेला. तसेच बोगदा क्रमांक ५१ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रुळाखालचा खडीचा थर वाहून गेला होता. (Rail Route)

या आव्हानात्मक दुरुस्ती मोहिमेसाठी ११,७४५ कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली होती. यामध्ये २,५१४ विभागीय कर्मचारी आणि ९,२३१ कंत्राटी कामगारांचा समावेश होता. १८ जेसीबी, २० पोकलेन एक्स्कॅव्हेटर्स, पाइलिंग रिग मशीन, डंपर्स यांसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. याशिवाय ४६,४६० घनमीटर ग्रॅन्युलर सब-बेस, २,६०० घनमीटर मोठे दगड, ८,४१८ मीटर सेल्फ-ड्रिलिंग अँकर्स, १,८०० चौरस मीटर जिओमॅट, १,७०० घनमीटर गॅबियन भिंती आणि ७,५०० वाळूच्या पोत्यांचा वापर करण्यात आला. दुर्गम ठिकाणी साहित्य पोहोचवण्यासाठी ११० हून अधिक रेल्वे रेकची मदत घेण्यात आली.

मध्य मार्ग ७ जुलै रोजी, तर डाऊन मार्ग १४ जुलै रोजी सुरू करण्यात आला होता. मात्र सर्वाधिक नुकसान झालेल्या अप मार्गावरील काम पूर्ण करून २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.४२ वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. तात्पुरती दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी १२०० मिमी व्यासाच्या बोर्ड कास्ट-इन-सिटू पाइल्स आणि आरसीसी रिटेनिंग भिंतींचे कायमस्वरूपी कामही सुरू करण्यात आले आहे. (Railway)

मुंबई आणि पुणे यांना जोडणारी ही महत्त्वाची जीवनवाहिनी पुन्हा सुरू करण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अभियंते, पर्यवेक्षक आणि कामगारांचे मध्य रेल्वेने कौतुक केले असून, या काळात सहकार्य करणाऱ्या प्रवाशांचेही आभार मानले आहेत. मध्य रेल्वेने भविष्यातही सुरक्षित, विश्वसनीय आणि आरामदायी सेवा देण्याची ग्वाही दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >