Tuesday, July 28, 2026

Dattatray Bharne : शेतकऱ्यांकडून २ लाखांच्या आतील कर्जाची भरपाई घेऊ नका

Dattatray Bharne : शेतकऱ्यांकडून २ लाखांच्या आतील कर्जाची भरपाई घेऊ नका

 कृषिमंत्री दत्ता भरणे; शेतकऱ्यांना सातबारा कोरा झाल्याचे प्रमाणपत्र देणार

मुंबई : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये आणि त्यांना त्रास देऊ नये, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच लोकप्रतिनिधींच्या हस्ते कर्ज पूर्णपणे नील झाल्याचे (सातबारा कोरा) प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी मंगळवारी केली.(Datta Bharne)

राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित केले असून, आतापर्यंत दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील गंधोरा या गावातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीत २० ते ८० टक्क्यांपर्यंतच कर्जमाफी दिसत असल्याचा आरोप करत बँकांचे पासबुक माध्यमांसमोर मांडले जात होते. या गोंधळावर भाष्य करताना कृषीमंत्र्यांनी सांगितले की, "ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांच्या आत आहे, त्यांनी कोणतीही भरपाई अथवा रक्कम बँकेत भरण्याची गरज नाही. काही तांत्रिक कारणे किंवा कागदपत्रांच्या त्रुटींमुळे काही नावे प्रलंबित असू शकतात, परंतु पात्र असणाऱ्या एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai News)

बँकांनी त्रास दिल्यास कारवाई

बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावू नये, असे कृषीमंत्र्यांनी बजावले आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना वरील रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. लवकरच कर्जमुक्तीची पुढची यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. या योजनेद्वारे सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त करून त्यांच्या हातात सातबारा कोरा झाल्याची प्रमाणपत्रे सोपवली जातील, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >