Friday, July 24, 2026

Navnath Ban : विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरे बंधूंचे राजकारण; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी फटकारले

Navnath Ban : विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरे बंधूंचे राजकारण; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी फटकारले

आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी उद्धव, राज ठाकरेंचा मोर्चा

मुंबई : उबाठा गट आणि मनसेच्या वतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल, असे दोन्ही पक्षनेत्यांनी सांगितले असले तरीही आदित्य आणि अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य पक्के करणे एवढाच या मोर्चाचा अजेंडा आहे. दिल्लीत राहुल गांधींच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेस दिल्लीत विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आंदोलन करते आहे. अगदी त्याचपद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे आदित्य आणि राज ठाकरे हे अमित ठाकरेंचे भवितव्य पक्के करण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कितीही आंदोलन केले तरी त्याचा जनतेवर अजिबात परिणाम होणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलकांशी सातत्याने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी काल उपोषण मागे घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि पेपरफुटी प्रकरणात कठोर कायदा करण्याची तयारीही सरकारने केली आहे. असे असताना या देशात अराजकता पसरवण्याचे काम काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. देशातील जनता, तरुणाई - विद्यार्थी याला बळी पडणार नाहीत, असे बन यांनी सुनावले.

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठलाय, असा सवाल करत बन म्हणाले ते सातत्याने सोनम वांगचुक यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताहेत. उपोषण जंतर-मंतरवरून का मागे नाही घेतले नाही, असे म्हणत ते सोनम वांगचुक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताहेत. सरकार चर्चेसाठी तयार असताना अडेलतट्टूपणाची भूमिका घेणाऱ्या संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी भांडुपच्या गाढव नाक्यावर बसून किमान दोन दिवसांचे तरी कडकडीत उपोषण करत विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. हे कोरडे उमाळे थांबवा. घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही, असा चिमटाही बन यांनी काढला.

नीट पेपरफुटी प्रकरणावर आणि आंदोलनाबद्दल चर्चा करायला सरकार तयार असताना विरोधकांना, काँग्रेसलाही चर्चा होऊ द्यायची नाही. केवळ पळपुटेपणा करायचाय. संसदेतल्या अधिवेशनात तीन दिवस रोज उठून गदारोळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेस सातत्याने चर्चेपासून पळ काढते आहे. कारण बांगलादेश, नेपाळप्रमाणे भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करायची, जाळपोळ करण्याचे षडयंत्र रचायचे हाच त्यांचा अजेंडा असल्याचे बन म्हणाले.

मुंबई, महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा कट

रोहित पवार यांनी ट्विट केलेला पोलिसांचा संपूर्ण व्हिडिओ बारकाईने पाहिल्यावर स्पष्टपणे लक्षात येतेय की पोलीस अधिकाऱ्यांनी धावत निळ्या शर्टाच्या आंदोलकाला पकडल्यानंतर ती संबंधित महिला मधे आली आहे. तो पोलिस अधिकारी कुठेही गैरकृत्य करताना दिसत नाही. आधी व्हिडिओ नीट पहा. रोहित पवार आणि वर्षा गायकवाड, राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करायचाय का? आंदोलन करायचे असेल तर सरकार आणि भाजपाविरोधात आंदोलन करा. त्याचे स्वागत आहे. मात्र कृपा करून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करू नका, असे बन म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >