Wednesday, July 22, 2026

NITESH RANE : वैभववाडी नाधवडे येथील प्रस्तावित 'एमआयडीसी' आता पर्यायी जागेवर; पालकमंत्री नितेश राणे

NITESH RANE : वैभववाडी नाधवडे येथील प्रस्तावित 'एमआयडीसी' आता पर्यायी जागेवर; पालकमंत्री नितेश राणे

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे होणार फायदा

मुंबई : वैभववाडी तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) नाधवडे येथे प्रस्तावित असलेला औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) प्रकल्प पर्यायी जागेवर उभारला जाणार आहे. संबंधित जमिनीचा पूर्व इतिहास आणि ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. वैभववाडी तालुक्यातच एमआयडीसीसाठी दुसरी योग्य जागा शोधण्याचे स्पष्ट आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मंत्रालयात मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाधवडे येथील प्रस्तावित एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाधवडे गावातील ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या प्रतिनिधींनी त्या जमिनीच्या १९९६ पासूनच्या इतिहासाबाबतची आणि स्थानिक परिस्थितीबाबतची महत्त्वाची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडली. ग्रामस्थांच्या या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने ही जागा बदलण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "नाधवडे येथील प्रस्तावित जमिनीचा इतिहास आणि स्थानिक ग्रामस्थांचा विरोध तसेच मुंबई मंडळाच्या भावनांचा सन्मान करून आम्ही एमआयडीसीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे निश्चित केले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. एमआयडीसी वैभववाडी तालुक्यातच होणार असून, त्यासाठी प्रशासनाला नव्या जमिनीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच नवीन जागा निश्चित केली जाईल आणि नियोजित एमआयडीसी वैभववाडीतच साकारली जाईल."

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे मोठा फायदा

वैभववाडीत उभ्या राहणाऱ्या या एमआयडीसीमुळे आणि प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे या परिसराचा कायापालट होणार असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले, "प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे एका बाजूला कोल्हापूरला मोठा व्यापारिक फायदा होईल, तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीमुळे वैभववाडीच्या आणि संपूर्ण जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल. वेगळ्या जमिनीवर ही एमआयडीसी लवकरच यशस्वीपणे उभी राहील आणि परिसराचा सकारात्मक विकास साधला जाईल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >