Tuesday, July 21, 2026

Nashik Kumbhmela : १००८ खालसांना सुविधा द्या, अमृत स्नान मार्ग रुंद करा- महंत संजय दास यांची मागणी

Nashik Kumbhmela : १००८ खालसांना सुविधा द्या, अमृत स्नान मार्ग रुंद करा- महंत संजय दास यांची मागणी

Nashik Kumbhmela : आखाड्यांसाठी आवश्यक जमीन जवळच्या परिसरात उपलब्ध करून द्यावी, अमृत स्नानाच्या मार्गाचे रुंदीकरण करून अतिक्रमणे हटवावीत, अशा प्रमुख मागण्या राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता साधू महंत संजय दास (Sadhu Mahant Sanjay Das) यांनी पत्रकार परिषदेत केल्या. पुढील बैठकीत हे प्रश्न मार्गी लागलेले असतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आखाड्यांसाठी लागणारी जमीन जास्त लांब अंतरावर नसावी, अशी आमची भूमिका आहे. शाही स्नानासाठी जाणाऱ्या मार्गाची रुंदी वाढवणे आवश्यक आहे. तसेच अतिक्रमणे हटवण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. पुढील बैठकीत येईपर्यंत हे प्रश्न सुटलेले असतील, अशी अपेक्षा आहे, असे संजय दासजी (Sadhu Mahant Sanjay Das) म्हणाले. देशभरात १००८ खालसे आहेत. त्यानुसार आखाड्यांना आवश्यक त्या सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांबाबत समाधानी

किन्नर आखाड्यांच्या अस्तित्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, किन्नर आखाड्यांचे कोणतेही अस्तित्व नाही. देशात केवळ १३ आखाडे आहेत आणि त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही आखाड्यांना मान्यता नाही. या १३ आखाड्यांशिवाय कोणालाही आखाड्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. काही जण स्वतःला साधू म्हणून घेत आहेत, मात्र ते आखाड्यांमधून बहिष्कृत करण्यात आलेले आहेत. अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. येत्या काळात गोदावरी नदी स्वच्छ होईल, असा विश्वास संजय दासजी यांनी व्यक्त केला. तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांबाबत आम्ही समाधानी आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कुंभ लोगोमध्ये धनुष्य हवे

कुंभ लोगोबाबत बोलताना संजय दास म्हणाले की, लोगोमध्ये असलेली चिन्हे कायम ठेवण्यात यावीत. मात्र, त्यामध्ये प्रभू रामाचे धनुष्य देखील समाविष्ट करण्यात यावे, तपोवन येथील साधुग्रामसाठी असलेली जमीन आम्हाला हवी आहे. प्रशासनाने ती जमीन कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यायची, हा त्यांचा निर्णय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >