Tuesday, July 21, 2026

Narendra Modi : ५६ वर्षांच्या ‘तरुणा’बद्दल बोलत नाही…; पंतप्रधान मोदी यांचा नाव न घेता राहुल गांधींना टोला!

Narendra Modi : ५६ वर्षांच्या ‘तरुणा’बद्दल बोलत नाही…; पंतप्रधान मोदी यांचा नाव न घेता राहुल गांधींना टोला!

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (२० जुलै) सुरवात झाली. या अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे अधिवेशन अतिशय सकारात्मक आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर, विशेषतः लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. हैदराबादमधील ‘स्कायरूट एरोस्पेस’ या स्पेस स्टार्टअपने केलेल्या यशस्वी रॉकेट प्रक्षेपणाचा उल्लेख करताना, “मी ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही,” असा खोचक टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) देशातील युवाशक्तीचे भरभरून कौतुक केले, तसेच संसदेचे कामकाज सुरळीत आणि उत्पादक चालण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहनही केले.

स्कायरूट या स्टार्टअपच्या टीममधील सदस्यांचे सरासरी वय केवळ २८ वर्षे असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, “मी ५६ वर्षांच्या एखाद्या ‘तरुणा’बद्दल नाही, तर अंतराळात भारताचा तिरंगा फडकवणाऱ्या खऱ्या युवाशक्तीबद्दल बोलत आहे. भारतीय तरुणांनी अंतराळातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. भारताच्या युवा पिढीची क्षमता आणि आकांक्षा आता अंतराळासारख्याच अथांग झाल्या आहेत. देश आज सुधारणांच्या एक्स्प्रेसवर स्वार झाला आहे, म्हणूनच आपले तरुण अशा नवनवीन गोष्टी करून दाखवत आहेत.” (Narendra Modi)

संसदेत सकारात्मक चर्चेची गरज :

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी (Narendra Modi) पावसाळ्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “पावसाळा असो किंवा पावसाळी अधिवेशन, दोन्ही गोष्टी जर सक्रिय असल्या तर त्या तितक्याच उत्पादक ठरतात. जेव्हा दोन्ही उत्पादक असतात तेव्हा देशाचे कल्याण आणि सर्वांचे भले होते. त्यामुळे मान्सून सक्रिय आणि उत्पादक असावा, तसेच पावसाळी अधिवेशनही उत्पादक ठरावे, अशी आम्ही प्रार्थना करतो.”

देशाने आता विकासाचा वेग पकडला असून, अशा वेळी संसदेतील सकारात्मक वातावरण देशाला नवी ऊर्जा देईल, असे त्यांनी नमूद केले. आपल्या संसदेत सर्वच पक्षांचे अनेक अनुभवी खासदार आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग होणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, “जिथे तथ्य आणि ठोस युक्तिवाद असतात, तिथे गोंधळाची किंवा वादळाची गरज नसते. संसदेत प्रत्येक विचाराला, युक्तिवादाला आणि तथ्याला योग्य सन्मान मिळेल, अशी मला आशा आहे. देशभक्तीचा आवाज संसदेत योग्य प्रकारे गुंजला पाहिजे.” (Narendra Modi)

भारताची वेगाने घोडदौड :

पश्चिम आशियातील युद्धाच्या संकटाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “जागतिक परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताचा विकासदर ७.७ टक्के राहिला आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, ही भारताच्या क्षमतेची प्रचिती आहे.” (Narendra Modi)

वंदे मातरम' विधेयकाचाही समावेश :

पावसाळी अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वाची विधेयके सादर करणार आहे. यामध्ये 'वंदे मातरम' विधेयकाचाही समावेश असणार आहे. दुसरीकडे, जंतर-मंतरवरील विविध आंदोलने, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या दानातील कथित अपहार यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी आणि राजकीयदृष्ट्या तापलेले राहण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी (Narendra Modi) सर्व नवनिर्वाचित आणि वरिष्ठ खासदारांचे संसदेत स्वागत केले आणि देशाच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >