Tuesday, July 21, 2026

Nashik : नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित; मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीचे आश्वासन

Nashik : नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित; मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीचे आश्वासन

Nashik : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष श्री. करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस पूर्ण झाला.सरकारने अद्याप मागण्यांची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज आंदोलनस्थळी सर्व शेतकऱ्यांनी काळे कपडे परिधान करून "काळा दिवस" पाळत तीव्र निषेध नोंदविला. शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे व आंदोलनाच्या वाढत्या तीव्रतेची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांनी सायंकाळी सुमारे 6.00 वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी मा. गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळावरूनच मुख्यमंत्री कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिनांक 21 किंवा 22 जुलै रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

तसेच, "शेतकऱ्यांची घरे कोणत्याही परिस्थितीत वाचवली जातील," असे आश्वासन देत त्यांनी विशेषतः उपस्थित महिला शेतकऱ्यांनाही विश्वास दिला. या पार्श्वभूमीवर त्यांनी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष श्री. करण गायकर यांना अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मा. गिरीश महाजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीचे आश्वासन आणि प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

बैठकीनंतर मागण्यांबाबत काय निर्णय होतो, यावर पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार आहे.यानंतर मा. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण गायकर, गोकुळ लांबे, ज्ञानेश्वर वेगळे आणि विनोद कातड यांना ज्यूस पाजून अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली. सायंकाळी सुमारे 7.00 वाजता आंदोलन अधिकृतपणे तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे सर्व पदाधिकारी, रिंग रोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे पक्षाला अस्तित्व राहिलेले नाही - गिरीश महाजन

दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे जलसंपदामंत्री तथा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार हल्लाबोल केला आहे. या पक्षांच्या आंदोलनाला माणसे मिळत नाहीत. त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आंदोलने होत आहेत. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गटही सहभागी झाल्यावरून मंत्री महाजन यांनी दोन्ही पक्षांवर टिकास्त्र सोडले. ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत. “हे पक्ष मोठा गाजावाजा करतात, मात्र त्यांच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या मागे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होतं, तिथे हे जाऊन सहभागी होतात,” असा टोला त्यांनी लगावला. महाजन यांनी पुढे दावा केला की, विरोधी पक्षांकडे स्वतंत्र जनाधार उरलेला नसल्याने ते इतरांच्या आंदोलनांचा आधार घेत आहेत. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय उपस्थिती दाखवण्यासाठी ते अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >