Monday, July 20, 2026

Chandrashekhar Bawankule : 'कॉकरोच' आंदोलनाआडून मोदी आणि फडणवीसांना डॅमेज करण्याचा विरोधकांचा कट; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : 'कॉकरोच' आंदोलनाआडून मोदी आणि फडणवीसांना डॅमेज करण्याचा विरोधकांचा कट; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 समाजातील विशिष्ट गट सक्रिय असल्याचा दावा

मुंबई : नवी दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनावरून विरोधकांकडून सुरू असलेले राजकारण म्हणजे निव्वळ नौटंकी असून, या आंदोलनाच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डागाळण्याचा (डॅमेज करण्याचा) विरोधकांचा कट असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठीच अशा स्वरूपाची आंदोलने पेटवली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन सुरू असून, त्याला महाराष्ट्रातील विरोधी पक्ष व काही विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी समाजात एक विशिष्ट गट सक्रिय झाला असून, विरोधकांचे हे 'कॉकरोच' आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी आहे. हातात कोणताही ठोस मुद्दा उरला नसल्याने केवळ लोकांच्या मनात चीड निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांना नक्कीच मनस्ताप झाला असून ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत, याचा अर्थ असा नाही की सरकारने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. सिस्टममधील काही घटकांनी बदमाशी केली असून सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे, तसेच नीट परीक्षा पुन्हा घेतली आहे. अशा वेळी सुधारणा सुचवण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून केवळ राजकारण केले जात आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार

अयोध्या राम मंदिर प्रकरणावरून उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे उदाहरण दिले. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा भ्रष्ट्राचार झाला, तेव्हा तिथे उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचा अध्यक्ष होता; मग तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अयोध्येत चोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे अध्यक्षांचा किंवा मंत्र्यांचा राजीनामा मागणे ही उद्धव ठाकरेंची नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण असूनही मतांच्या लांगूलचालनासाठी आणि महाराष्ट्रात काही विशिष्ट मते कमी होतील या भीतीने ठाकरे अयोध्येला गेले नाहीत. आयुष्यभर प्रभू रामचंद्रांचा तिरस्कार करणाऱ्यांनी आता अशा आंदोलनांचे राजकारण करून काहीही साध्य होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा