ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान
अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा पठणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील हनुमान गढीवर जाऊन महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण केले. अमरावतीतील तब्बल १५१ फूट उंच हनुमान मूर्तीच्या पायथ्याशी हा भव्य पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राणा दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत त्यांना थेट अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचण्याचे जाहीर आव्हान दिले.
'उद्धव ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी'
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय (ऑर्बिटल-क्लास) रॉकेट 'विक्रम-1' (Vikram-1) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरोट ...
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नवनीत राणा म्हणाल्या की, "उद्धव ठाकरे आता रामरक्षा वाचत आहेत, मात्र त्यांनी अमरावतीत येऊन आमच्यासोबत हनुमान गढीवर हनुमान चालीसाचे पठण करावे," असे खुले निमंत्रण राणा दाम्पत्याने त्यांना दिले आहे.
'१४ दिवसांचा तो तुरुंगवास मी कधीच विसरणार नाही'
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून राणा दांपत्याला अटक करण्यात आली होती, या आठवणींना नवनीत राणा यांनी यावेळी उजाळा दिला. अत्यंत संतप्त भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "केवळ हनुमान चालीसा वाचणार म्हटल्यामुळे मला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ दिवस जेलमध्ये टाकले होते. तो दिवस आणि तो अन्याय मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही."
'जनाब उद्धव ठाकरे हे मोदी आणि फडणवीसांना धोका देणारे नेते'
राजकीय हल्लाबोल करताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'जनाब उद्धव ठाकरे' असा केला. त्या म्हणाल्या की, "जनाब उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला आहे. त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्याशीच गद्दारी केली."