नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय (ऑर्बिटल-क्लास) रॉकेट 'विक्रम-1' (Vikram-1) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरोट एरोस्पेसच्या (Skyroot Aerospace) संस्थापकांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला. पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधानांनी या क्षणाला भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक 'मैलचा दगड' म्हटले आहे. या यशामुळे देशाच्या अंतराळ मोहिमांना तर बळ मिळेलच, शिवाय नवीन पिढीला संशोधनासाठी मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"अंतराळात नवीन झाड, जमिनीवर घट्ट मूळ"
VIDEO | Sri Harikota, Andhra Pradesh: Prime Minister Narendra Modi (@narendramodi) congratulates Skyroot Aerospace over a telephone call after India's first privately developed orbital rocket, Vikram-1, successfully reaches orbit, completing its final burn and injecting payloads… pic.twitter.com/lctCsAwMtu
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2026
या ऐतिहासिक प्रक्षेपणानंतर लगेचच संस्थापकांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अतिशय मार्मिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका, तुम्ही केवळ अंतराळात एक नवीन झाड लावले नाहीये, तर जमिनीवर एक नवीन मूळ देखील घट्ट रोवले आहे, जे आगामी तरुण पिढीला कायम प्रेरणा देत राहील."
युवा टीमचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक
या मोहिमेबाबत आपली उत्सुकता सांगताना मोदींनी स्पष्ट केले की, ते या प्रक्षेपणावर सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष ठेवून होते. "मला या युवा टीमसोबत तिथे उपस्थित राहायला नक्कीच आवडले असते. मी या प्रक्षेपणाचे क्षणोक्षणी अपडेट्स घेत होतो. तुमच्या संपूर्ण टीमचे या अभूतपूर्व यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, तुमच्या टीममधील बहुतांश सदस्य हे २५ ते ३० वयोगटातील आहेत, हे पाहून मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटला," अशा शब्दांत पंतप्रधानांनी तरुणाईचे भरभरून कौतुक केले.
खाजगीकरणाच्या निर्णयावरील टीकाकारांना चोख उत्तर
केंद्र सरकारने जेव्हा भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, तेव्हा अनेकांनी त्याबाबत साशंकता व्यक्त केली होती, या आठवणीलाही मोदींनी यावेळी उजाळा दिला. मात्र, 'विक्रम-1' ने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे सरकारच्या त्या धोरणात्मक निर्णयाची सत्यता आणि उपयुक्तता संपूर्ण जगासमोर सिद्ध झाली आहे, असेही ते म्हणाले.
डॉक्टरांचा सल्ला; पुढील काही काळ भाषणे, मुलाखतींपासून दूर मुंबई(Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया ...
'एक्स' वरून व्यक्त केला आनंद
या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या समाजमाध्यमावरही या यशाचा गौरव केला. स्कायरोट टीमशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत ते म्हणाले, "विक्रम-1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल स्कायरोट एरोस्पेस टीमचे अभिनंदन. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक निर्णायक क्षण आहे. खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग आता नवनवीन क्षितिजे खुली करत असून त्यामुळे नावीन्यपूर्णतेला (Innovation) वेग येत आहे. या यशामुळे लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि निडरपणे संशोधन करण्याचे बळ मिळेल."
'वंदे मातरम' लिहिलेले पंतप्रधानांचे पत्र गेले अंतराळात
या मोहिमेला एक भावनिक आणि वैयक्तिक किनारही होती. 'विक्रम-1' सोबत पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षरातील एक खास पोस्टकार्ड अंतराळात पाठवण्यात आले, ज्यावर "वंदे मातरम" असे कोरले होते. या व्यतिरिक्त, स्कायरोटचे कर्मचारी, गुंतवणूकदार, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि जगभरातील हितचिंतकांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली अनेक पोस्टकार्ड्सही या रॉकेटमधून अवकाशात रवाना झाली.
'मिशन आगमन' : दिग्गजांना मानवंदना
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी 'इस्रो'चे (ISRO) आजी-माजी अध्यक्ष आणि भारतीय अंतराळवीरांनीही आपले हस्तलिखित संदेश या मोहिमेसोबत पाठवले होते. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला आकार देणाऱ्या अनेक दशकांच्या प्रवासाला याद्वारे मानवंदना देण्यात आली. स्कायरोटने या आगळ्यावेगळ्या पेलोडचे वर्णन करताना सांगितले की, "ही 'मिशन आगमन' (Mission Aagaman) मोहीम म्हणजे अनेक हातांनी घडवून आणलेला आणि लाखो भारतीयांनी अनुभवलेला एक भव्य सोहळा आहे. ज्यांनी भारताला जागतिक अंतराळ महासत्ता बनवण्यात योगदान दिले, त्यांचा सन्मान करण्यासाठी या पोस्टकार्ड्सचा संग्रह सोबत पाठवण्यात आला."
भारताच्या खाजगी अंतराळ युगाची यशस्वी पहाट
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून (SDSC-SHAR) 'विक्रम-1' चे यशस्वी प्रक्षेपण करत भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राने आज सुवर्णाक्षरांनी नवा इतिहास रचला आहे. उड्डाणापूर्वी एका तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब झाला असला, तरी त्यानंतरची मोहीम अगदी निर्दोषपणे पार पडली. 'मिशन आगमन' असे नामकरण करण्यात आलेल्या या उड्डाणात रॉकेटच्या चारही टप्प्यांचे (Stages) विलगीकरण पहिल्याच प्रयत्नात अचूकपणे झाले आणि उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. या यशामुळे भारत आता जगातील अशा मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, जिथे एखाद्या खाजगी कंपनीने स्वतःच्या बळावर कक्षीय श्रेणीतील (Orbital-class) रॉकेट डिझाइन करून ते यशस्वीरित्या अंतराळात झेपावले आहे.