पर्यायी वृक्षारोपण आणि पुनर्रोपण मुंबईतच करण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश
नगरसेवकांना जागा सुचवण्याची प्रशासनाने केली सुचना
मुंबई : मुंबईतील विविध प्रकल्प कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावण्या येणारी झाडे (Trees) ही मुंबईत जागा नसल्याने पनवेल तसेच इतर ग्रामीण भागातील वन विभागाच्या जमिनींवर लावण्यात येत आहे. परंतु याला स्थायी समिती सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मुंबई प्रकल्पातील बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पर्यायी लावण्यात येणारी झाडे ही मुंबईतच लावली जावी, आरे कॉलनीसह ज्या जागांवरील झाडे पडली आहेत तिथे ती लावली जावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईतील झाडे कापल्यास ती मुंबई (Mumbai) बाहेर लावली जावू नये असे निर्देशच प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहे. त्यावर अखेर प्रशासनाने आता नगरसेवकांनी जागा सुचवल्यास तिथे प्रकल्पांमधील बाधित झाडे किंवा अन्य प्रकारचे वृक्षारोपण केले जाईल असे स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्यावतीने मुलुंड 'टी' विभागातील महाराणाप्रताप चौक एल बी एस रोड येथे आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम करण्यात येत आहे. या स्कायवॉकच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून या स्कायवॉकच्या बांधकामासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु या स्कायवॉकच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणमध्ये एकूण १० वृक्ष बाधित होत असल्याचे दिसून आले. यामध्ये ७ वृक्ष कापणे, ३ वृक्षांची पुनर्रोपण करणे तसेच ५ झाडे आहे तिथे ठेवण्यात येणार आहे. ही झाडे पनवेल येथील वडघर या गावात ही झाडे लावली जाणार आहेत.
मुंबई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि त्यामुळे समुद्रात वाहून गेलेला तसेच भरतीच्या लाटांमुळे पुन्हा किनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट ...
याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबईतील या झाडांचे पुनर्रोपण आणि पर्यायी वृक्षारोपण (Tree Plantation) हे पनवेलमध्ये न करता मुंबईतील आरे कॉलनीमध्ये (Aarey Colony) करावी अशी कळकळीची विनंती केली. मुंबईतील झाडे कापल्यानंतर जर त्यांचे पुनर्रोपण आणि वृक्षारोपण जर मुंबईत केले तरच शहराचे पर्यावरण संतुलन राखले जाईल. यासाठी वन विभाग आणि दुग्ध विभागाची पत्रव्यवहार करून हे वृक्षारोपण केले जावे अशी मागणी करतानाच त्यांनी मुंबईमध्ये जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करावी. जेणेकरून त्यावर पक्षांचा किलकिलाट ऐकू येईल,असे त्यांनी सांगितले.
तर मनसेच यशवंत किल्लेदार यांनी मुंबईत पावसाळ्यात हजारो झाडे पडली असून त्या पडलेल्या जागांवर ही झाडे लावली जावी आणि देशी झाडे असावी. तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी प्रकल्पांत बाधित होणाऱ्या झाडांचे पर्यायी वृक्षारोपण गोवंडी केली जावी अशी मागणी केली. खऱ्या अर्थाने गोवंडीत झाडांची जास्त गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबईतले झाडे कापणार आणि मुंबईबाहेर लावणार हे उद्यान विभाग तसेच पर्यावरण विभाग कसे मान्य करते असा सवाल करत श्रध्दा जाधव यांनी यापुढे मुंबईतच झाडे लावली गेली पाहिजे असे सांगितले.
यावर अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उद्यान विभागाने मुंबईत अशी झाडे लावण्यास जागा नसल्याने वन विभागाशी चर्चा करून पनवेलमध्ये पर्यायी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जर नगरसेवकांना पडलेल्या झाडांच्या जागी नव्याने झाडे लावायची असतील तर त्यांनी तसे सुचवावे. तिथे झाडे लावली जातील. याशिवाय जिथे मोकळी जागा आहे आणि तिथे झाडे लावता येतील अशा जागा नगरसेवकांनी सुचवल्या तर तिथे पर्यायी वृक्षारोपण करण्याचा निश्चितच विचार केला जाईल असे सांगितले. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यापुढे पर्यायी झाडे मुंबई बाहेर लावण्याचे प्रस्ताव आणले जावू नये तर ते मुंबईतील बाधित झाडे तोडल्यानंतर त्यांचे वृक्षारोपण हे मुंबईतच केले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले.