Vinayak Raut News : विनायक राऊतांची सून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राऊत कुटुंबियांचा पाय खोलात; फिरोज बाबा शेखच्या साथीदारालाही अटक


मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत(Vinayak Raut)यांचे चिरंजीव आणि मुंबई महापालिकेचे नगरसेवक गितेश राऊत(Gitesh Raut) यांच्या पत्नी गिरीजा राऊत यांनी संपूर्ण राऊत कुटुंबाविरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आता या प्रकरणात महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. गिरीजा यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्यासोबत सासरच्या घरी नक्की काय काय अघोरी प्रकार घडले, याची सविस्तर आपबिती त्या मांडणार आहेत. गिरीजा राऊत यांच्या या पावलामुळे विनायक राऊत यांच्यासमोरील अडचणींमध्ये कमालीची वाढ झाली असून राऊत कुटुंबीयांचा पाय अधिकच खोलात गेल्याचे पाहायला मिळत आहे.



दुसरीकडे, ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आणि सध्या पोलीस कोठडीत असलेल्या भोंदू फिरोज बाबा शेख याचा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार याला ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने सिंधुदुर्गातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आरोपी राम वडार याने या अघोरी गुन्ह्यात आपला प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली आहे. मुख्य भोंदू फिरोज शेख(Firoj Shekh) याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून, नवीन आरोपीच्या अटकेमुळे आणि त्याने दिलेल्या कबुलीमुळे संपूर्ण घटनाक्रमाला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. ठाणे पोलीस फिरोज शेखच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात करणार असून, कोठडी वाढल्यास या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावे आणि नवनवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे सुपुत्र गितेश, पत्नी शामल राऊत, चुलत सासरे आबा राऊत आणि भोंदू मांत्रिक फिरोज शेख, काझी बाबा व हरिश्चंद्र घाडी अशा एकूण ७ जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात १० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीजा यांनी तक्रारीत केलेल्या आरोपांनुसार, २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर सुरुवातीला वाकोला येथे बंगला असल्याचे सांगणाऱ्या राऊत कुटुंबाने त्यांना प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात नेले आणि जाब विचारला असता त्यांच्या पालकांना झिडकारण्यात आले. तसेच त्यांचे वैयक्तिक काम सोडवून गितेश यांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करण्यास भाग पाडण्यात आले. लग्न झाल्यापासून पती गितेश यांनी आपल्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास कायम टाळाटाळ केली, परदेशात (विदेशात) गेल्यावर जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता मारहाण केली आणि मुंबईत व गावी असताना 'आईला आवाज जाईल' अशी वेगवेगळी कारणे सांगत 'मी नाजूक मुलगा आहे' असे म्हणून मानसिक छळ केला, असा गंभीर आरोप गिरीजा यांनी केला आहे.(Crime News)




पतीचे नपुंसकत्व लपवण्यासाठी अघोरी विधी


तक्रारीतील सर्वात हादरवणारा भाग म्हणजे सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत करण्यात आलेले अघोरी प्रकार आणि जादूटोणा. गिरीजा यांच्या आरोग्यावरील बंधन दूर करण्याच्या नावाखाली सासरच्या मंडळींनी घरी भोंदू मांत्रिकांना बोलावले. चुलत सासरे आबा राऊत यांच्या अंगात देवीचा संचार झाल्याचे सांगून त्यांनी जोपर्यंत उपचार पूर्ण होत नाही तोपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे बजावले. त्यानंतर विनायक राऊतांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी आणि पती गितेश यांनी गिरीजा यांना सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे फिरोज बाबा, राजापूरचे काझी बाबा आणि कुडाळच्या हरिश्चंद्र घाडी यांच्याकडे नेले. तिथे डोक्यावर लिंबू कापणे, अंगाभोवती कात्री फिरवणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, अंगारे-धुपारे, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा दाखवणे, गोमूत्र पाजणे, विभूती मिसळलेले पाणी पिण्यास देणे तसेच डोक्यावरील केस उपटणे असे भयानक आणि क्रूर अघोरी विधी करण्यात आले. प्रत्येक मांत्रिक शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करत असल्याने मूल कसे होणार, हा प्रश्न गिरीजा यांना पडला होता; मात्र नंतर हा सर्व अंधश्रद्धाळू प्रकार पतीचे नपुंसकत्व लपविण्यासाठी करण्यात येत असल्याचे आपल्या लक्षात आल्याचा दावा गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे.




राऊतांच्या जामीन अर्जावर २३ जुलैला सुनावणी


दरम्यान, या प्रकरणात संभाव्य अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी विनायक राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आता येत्या २३ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी पार पडणार असून, न्यायालय काय निर्णय देते आणि मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे