मित्र

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड


 

लिमये बाई वर्गात गोष्ट सांगत होत्या. वर्गात दत्तचित्र गोष्ट ऐकत होता. वर्गात टाचणी शांतता होती. एकही वि‌द्यार्थी गोष्टीपासून दूर नव्हता.तुम्ही सुद्धा ऐका हं मुला-मुलींनो ती सुंदर मैत्रीची कथा! ऐकून श्रीमंत व्हाल. माणूस म्हणून मोठ्ठे व्हाल. अगदी खरं सांगते, मित्र कसा असावा? तर असा असावा? तर असा असावा! ते दोघे घट्ट मित्र होते.अभिषेक आणि अनिल अशी त्या दोन मित्रांची नावं. अभि, अनिलवर जीव टाकी नि अनिल अभिवरती खूप प्रेम करी.


दोघे खेड्यात राहात नि शहराच्या शाळेत शिकत असत. शहराची शाळा मोठ्ठी, तिथे शिक्षक नावाजलेले, विद्वान आणि नवनवीन ज्ञानाची दारे उघडणारे असे ज्ञानी शिक्षक!तर गोष्ट अशी आहे मित्रांनो! सांगते हं! दोन अगदी जीवाचे मित्र असतात. एकदा जंगल पार करताना वाघाची डरकाळी ऐकू येते. दोघे घाबरतात.दचकून झाडावर चढतात. पण वाघ सरसर झाडावर चढतो नि दोघांना...बाई थांबल्या. मग वर्गाकडे बघून म्हणाल्या, “तुम्ही काय केलं असतंत अशा वेळी?”
वर्ग शांत होता.


“विनायक, तू सांग!” बाई म्हणाल्या. विनायक पटकन म्हणाला, “बाई, माझा मित्र वाघाच्या तावडीत सापडला आहे, हे बघून मी जोरात पळालो असतो. शेवटी स्वतःचा जीव महत्त्वाचा! नाही का बाई? वर्गाला ते अगदी पटले. शेवटी स्वतःचा जीव महत्त्वाचा असतोच प्रत्येकाला! खरं की नाही?पण बाईनी गोष्टीला वेगळेच वळण दिले. त्या म्हणाल्या, “ऐका हं! अभि आणि अनिल घट्ट मित्र होते हे मी तुम्हांला सगळ्यांनाच सांगितलंच.
“हो बाई” मुलं म्हणाली.
“मित्र कशाला म्हणतात? कोणाला म्हणतात?”
“जो आपल्याला खूप अावडतो”. विनायक म्हणाला.
“ज्याच्याशी आपले विचार जुळतात.” निशा म्हणाली.
“ज्याच्यावर आपले खूप प्रेम असते.” सुरेखा म्हणाली.
पण एक मुलगा उठला सूरज नावाचा! तो म्हणाला.
“बाई, प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.”
“हो ! हे बाकी खरं आहे”. बाईनी होकारार्थी मान डोलावली.
“सूरज, अशा वेळी काय केलं असतंस?


“बाई, मी इतक्या जोरात पळालो असतो की ...! वाघाला दिसणार नाही, अशा गुहेत शिरलो असतो. नाहीतर झाडीत लपून बसलो असतो. पण स्वतःचा जीव वाचवला असता.” “बाई, मला वाईट वाटलं असतं, पण स्वतःचा जीव वाचावा म्हणून मी पण लपून बसले असते. स्वतःवर माझे खूप प्रेम आहे. मी खोटं बोलत नाही. मला सर्व जगात मीच आवडते.” सर्व वर्ग तिच्याकडे संमतीच्या दृष्टीने बघत होता.
बाई तरीही गप्प होत्या. क्षणभराने त्यांनी गप्प राहाणे सोडले. “आता ऐका हं! पुढली गोष्ट सांगते.” वर्ग ऐकू लागला.
दत्त चित्त होऊन.
वर्गात टाचणी शांतता पुन्हा पसरली.
अभिषेक आणि अनिल दोघे घाबरले होते. वाघाची डरकाळी त्यांच्या मनात घुसली होती. आता तरी वाघ खाणार ही भीती मनभर पसरली होती. आता हे शेवटचे एकमेकांसोबत असलेले क्षण!
अनिल अंगापिंडाने मजबूत होता. व्यायाम केलेले सुडौल शरीर होते. अभि थोडा कोवळा, लहानसुरा नि भित्रा होता.
“चल मित्रा माझ्या पाठीवर बस.” त्याने अभिला सांगितले.
“वेळ काढू नकोस.” नि त्याने अभिला पाठुगळी घेतले. सर सर झाडावरून उत्तरला नि समोरच्या गर्द झाडीत लपून बसला.
वाघ सरसर झाडावर चढला नि डरकाळ्या फोडीत राहिला. त्या दोन मुलांना शोधीत राहिला नि ती शिकार हातची गेली असे वाटून डरकाळ्या फोडीत जंगलात निघून गेला.
वाघ आता दिसत नाही, असे बघून दोघांनी सुखाचा श्वास टाकला. एकमेकांना आनंदाने मिठी मारली.
“अनिल, तू नसतास तर मी मेलोच असतो”.
“मित्रा, तू एवढीच किंमत कोलीस माझी ?”
“नाही रे अनिल ! मी मनात म्हणालो, स्वतःचा जीव मोलाचा ! तो वाचवणं महत्त्वाचं ! असे असताना तू मला वाचवलंस. ही प्राणापेक्षा मोठी गोष्ट आहे”.
“मित्रा, मी विचार केला मेलो तर मित्रत्वावर! जगलो तर मित्रा सकट!”
अभिने अनिलला घट्ट मिठी मारली. मैत्रीचे मोल त्याला कळले. अगदी मनाला भिडले. वर्ग शांत होता.

Comments
Add Comment

नर्मदा परिक्रमा

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे   भारतात गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती यांसारख्या अनेक पवित्र नद्या आहेत.

टाईमपास

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर   मागच्या मार्च महिन्यातली गोष्ट. सकाळी साडेनऊ दहाच्या सुमाराला मी कार घेऊन कामासाठी

व्यर्थ हा अमृताचा वसा...

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे   कोणताही कलाकार थोडाफार बंडखोर असतोच. जग ‘जसे आहे तसे’ त्याला मान्य नसते.

चला जाऊया पंढरी!

स्मृतीगंध-लता गुठे   आषाढी एकादशी जवळ आली की, महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांच्या मनात पंढरपूरची आस जागते.

आभाळमाता

जीवनगंध-पूनम राणे   जून महिन्याचा पहिला आठवडा. आभाळ भरून आले होते. आभाळात ढगांनी गर्दी केली होती. थंडगार वारा

आईचं पत्र हरवलं

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे खरंच हरवले ना! पत्र!! कारण संवाद हरवला आहे. मोबाईलच्या या नेट युगामध्ये नात्यांचं जाळंच