BMC News : पुढील वर्षी एप्रिल पर्यंत मिळणार १७० दशलक्ष लिटर पाणी- अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत वेगाने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश


मुंबई : समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्ता वाढीसाठी मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर ( पूर्व) येथे मलजल प्रक्रिया केंद्राचे ( एस टी पी) रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण प्रकल्प आणि घाटकोपर उदंचन केंद्राचे काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.या मलनिस्सारण प्रकल्पामध्ये, दररोज ३३७ दशलक्ष लिटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल, त्यापैकी १७० दशलक्ष मलजलावर दररोज पुढील तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. या पाण्याचा वापर पिण्या व्यतिरिक्त इतर वापराकरता केला जाणार आहे. सध्या घाटकोपर येथे अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रात मलजलावर स्क्रिनिंग आणि डिग्रिटिंगची प्राथमिक प्रक्रिया करून ते खाडीमध्ये सोडले जाते.



मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  अभिजित बांगर यांनी शनिवार ११ जुलै २०२६ रोजी पाहणी केली. उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) (प्रभारी) अशोक मेंगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.घाटकोपर उदंचन केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेल्या स्थापत्य व विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन घेतला. याठिकाणी उदंचन केंद्राच्या इमारतीची दुरूस्ती, संयंत्रे बदलणे, रायझिंग मेन टाकणे, अधिक क्षमतेचे पंप लावणे यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. सद्यस्थितीला उदंचन केंद्राच्या कामाची ८५ टक्के इतकी भौतिक प्रगती झाली आहे. मलजल प्रक्रियेसाठी महत्वाच्या अशा उदंचन केंद्राचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.




सध्या मुंबईत पावसाने उसंत घेतली असल्याने या कालावधीचा सदुपयोग प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी करावा, अशीही सूचना त्यांनी केली. प्रकल्पातील विविध टप्प्याचे काम हे समांतर पद्धतीने करावे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. नियोजनबद्ध काम केल्यास मुदतीपूर्व या प्रकल्पाचे काम पूर्ण करणे शक्य असल्याचेही बांगर म्हणाले.नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील लोकसंख्येला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.नवीन प्रकल्प बांधताना, अस्तित्वात असलेल्या मलजल प्रकल्पाचे प्रचालन व परिरक्षण करणे आवश्यक आहे. नवीन प्रकल्प बांधण्यापूर्वी सध्याच्या तलावातील गाळ काढणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सध्याची प्रकल्पाची सीमा खाडी, जंगल व इको सेन्सिटिव्ह झोन (ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य) यांनी वेढलेली आहे.




प्रकल्पाबाबत अतिरिक्त माहिती


मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम मे. जिव्हीपीआर इंजिनीयर्स लि. या कंत्राटदार कंपनीला ३१.०५.२०२२ रोजी प्रदान केले आहे. ०५.०७.२०२२ पासून काम सुरू झाले आहे. रचना व बांधकाम कालावधी ४ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी पुढील १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता मेसर्स एसएफसी एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आहेत. सल्लागार मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड आहेत. या कामामध्ये सिक्वेन्शियल बॅच रिअॅक्टर (एसबीआर) हे तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६