Saturday, July 11, 2026

Winter Session : विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार

Winter Session : विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार

हिवाळी अधिवेशनाआधी ५ आमदार निवृत्त होणार; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले असतानाच, आगामी हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांना आणखी एक धक्का बसणार आहे. विधान परिषदेतील ५ आमदारांचा कार्यकाळ येत्या ६ डिसेंबर रोजी संपणार असून, ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हे आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या ५ आमदारांपैकी ४ सदस्य विरोधी पक्षांचे असल्याने आगामी काळात वरिष्ठ सभागृहातील विरोधकांची ताकद कमी होणार असून, रिक्त होणाऱ्या या जागांसाठी नोव्हेंबर महिन्यात संभाव्य असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विरोधी बाकांवरील ४ आणि सत्ताधारी बाकांवरील (सहयोगी) १ अशा पाच आमदारांचा समावेश आहे. यामध्ये

">छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार अरुण लाड, आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी या तीन बड्या नेत्यांची मुदत संपत आहे. त्यांच्या जोडीलाच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अपक्ष आमदार किरण सरनाईक हे देखील निवृत्त होत आहेत. या पाचही सदस्यांनी आपल्या कार्यकाळात विधान परिषदेत शिक्षण, सहकार, शेती आणि विविध सामाजिक प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत सभागृहाचा दर्जा उंचावला होता.

निवृत्त होणारे अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सहयोगी सदस्य होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या मदतीने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ६ डिसेंबरला या पाच जणांची मुदत संपणार असल्याने आणि ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने, केंद्रीय निवडणूक आयोग साधारणतः नोव्हेंबर महिन्यातच या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. (Nagpur Adhiveshan)

विधिमंडळाकडून निरोप

पावसाळी अधिवेशनाच्या सांगता दिनी या पाचही सदस्यांना विधिमंडळात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही सभागृहातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांनी संसदीय कामकाजात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रिक्त होणाऱ्या या जागांवर पुन्हा आपले वर्चस्व राखण्यासाठी आणि विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >