Saturday, July 11, 2026

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहारांची चौकशी उद्धव ठाकरेंनी का केली नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहारांची चौकशी उद्धव ठाकरेंनी का केली नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात कठोर कारवाई होणार

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कथित भ्रष्टाचार आणि अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. "सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या आक्षेपांना मी उत्तर दिले आहे; मात्र जेव्हा सिद्धिविनायक मंदिरात हा सगळा गैरव्यवहार झाला, तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश का दिले नाहीत?" असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच, अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दान चोरीच्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्या सर्वांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना तुरुंगात धाडले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, आमचे महायुती सरकार नेहमीच बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचाच आहे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीच्या अटी पूर्णपणे काढून टाकल्या आहेत. ५० हजारांच्या वरची अट रद्द केल्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार असून, हा बळीराजाला मिळालेला खूप मोठा दिलासा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या ऐतिहासिक कर्जमाफीचे जाहीर कौतुक केले आहे. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते असून चांगल्या कामाला चांगले म्हणण्याची त्यांची नेहमीच वृत्ती राहिली आहे. परंतु, विरोधी पक्षातील काही लोकांना सरकारचे कितीही चांगले काम दिसले तरी केवळ टीका आणि आरोपच करायचे असतात. 'खोटं बोला पण रेटून बोला' अशी वृत्ती असणाऱ्या आपल्याच सहकाऱ्यांना खऱ्या अर्थाने शरद पवारांनी कौतुकातून चोख उत्तर दिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या नागपूर येथील प्रस्तावित 'रामरक्षा आंदोलना'चा समाचार घेताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "जनतेने जेव्हा शिक्षा केली, तेव्हा यांना रामरक्षा आठवू लागली आहे. हे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. 'जो राम का नाही, वो किसी काम का नही' हे आता त्यांना उमगले आहे. आपण जसे टी-शर्ट बदलतो, तसे हिंदुत्व बदलता येत नाही; ते रक्ताच्या कणात आणि मनातून असावे लागते. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेल्यावर राम अशी सध्या यांची अवस्था झाली असून, अयोध्येतील मंदिरावर सातत्याने टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणे हा एक मोठा विनोदच आहे. हनुमान चालीसा म्हटली म्हणून ज्यांनी लोकांना जेलमध्ये डांबले, त्यांनी आता मशालीने हनुमानाने लंका दहन केली, असा नवा शोध लावला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

माझ्याकडे सर्व पुरावे!

महाविकास आघाडीचे सरकार असताना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर कोण होते आणि तेव्हा दानपेटीवर कसा डल्ला मारला गेला, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. शिवसेनेत बाहेरून येणाऱ्या नेत्यांना आमदारकी किंवा इतर महत्त्वाची पदे दिली जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पक्ष पुढे नेण्यासाठी आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी काही राजकीय समीकरणे करावीच लागतात. पक्ष जितका मोठा होईल, तितकी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना पदे व संधी देता येईल. शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष असून, आज राज्यातील जनतेचा एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >