Saturday, July 11, 2026

मध्यरात्री मिरा रोडवर थरार! मीटर बॉक्सला भीषण आग; धुराच्या कोंडीत अडकलेल्या १०४ रहिवाशांची सुखरूप सुटका

मध्यरात्री मिरा रोडवर थरार! मीटर बॉक्सला भीषण आग; धुराच्या कोंडीत अडकलेल्या १०४ रहिवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : मिरा रोड पूर्व येथील एका निवासी इमारतीत मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना टळली. सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले. या धुराच्या कोंडीत तब्बल १०४ रहिवासी अडकले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.ही घटना गोविंद नगर (पार्श्वनगर) परिसरातील 'अक्वारिया' टॉवरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. रात्री सुमारे १.३३ वाजता तळमजल्यावरील मीटर बॉक्समधून अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्या. काही क्षणांतच इमारतीत दाट धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

धुरामुळे रहिवाशांमध्ये घबराट

बहुतांश रहिवासी गाढ झोपेत असताना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अनेकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र जिना धुराने भरल्याने अनेक जण इमारतीतच अडकून पडले. परिस्थिती गंभीर होताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

अग्निशमन दलाची शर्थीची बचावमोहीम

घटनेची माहिती मिळताच सिल्व्हर पार्क आणि स्व. कल्पना चावला अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी एका बाजूने आगीवर नियंत्रण मिळवले, तर दुसऱ्या बाजूने धुराच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांसह सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

२१ जण रुग्णालयात; प्रकृती स्थिर

धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या २१ रहिवाशांना उपचारासाठी परिसरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

विद्युत वायर जळाल्या, तपास सुरू

या आगीत महावितरणच्या सुमारे २२ ते २५ मीटर लांबीच्या विद्युत तारा जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि विद्युत व्यवस्थेची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >