Sunetra Pawar : शरद पवार-एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार वर्षावर

 अंतर्गत घडामोडींना वेग; उबाठा गटाचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुसऱ्याच दिवशी राजकीय वर्तुळात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, तर दुसरीकडे उबाठा गटाच्या प्रमुख आमदारांनीही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बंद दाराआड काही तास खलबते झाली होती; त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या या गाठीभेटींच्या सत्रामुळे आगामी काळातील मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत.(Ek nath Shinde)



उबाठा गटाच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांनी मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी ही भेट मुंबईतील विकासकामांसंबंधी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशीच सभागृहात मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्न आणि आगामी विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे उबाठा गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.(Devendra Fadnavis)




पवारांचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ - पृथ्वीराज चव्हाणांचा दावा


शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळीकीमुळे महाविकास आघाडीमध्ये, विशेषतः उबाठा गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. "शरद पवार यांचे ५ ते ६ खासदार सध्या अत्यंत अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखीच अवस्था आता पवारांच्या पक्षाचीही होऊ शकते. हे खासदार नाराज असले, तरी ते पक्ष सोडणार की नाही, हे मला ठाऊक नाही," असे ते म्हणाले.




शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकाच गाडीतून प्रवास


 दुसरीकडे, बुधवारी शरद पवारांचे स्वागत केल्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान त्यांच्यात तब्बल ३० मिनिटे चर्चा झाली.दरम्यान, विरोधी पक्षाकडून, विशेषतः संजय राऊत यांच्याकडून शरद पवार आणि आपल्या भेटीवर होत असलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले, शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत. सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी ते आले होते. त्यानंतर ते आमच्या दालनात आले म्हणून राज्याची राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी त्यांचे स्वागत करायला गेलो. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल किंवा ज्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक 'आपला दवाखाना' सुरू केले आहेत; त्यांनी तिथे जाऊन मोफत उपचार करून घ्यावेत. हा एक प्रकारचा कद्दूपणा असून आम्ही अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो", असा टोलाही त्यांनी लगावला.(Sunetra Pawar)




जयंत पाटलांसाठी शिवसेनेत जागा करू - प्रताप सरनाईक


याच भेटीवर सूचक वक्तव्य करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. उद्या उद्धव ठाकरे जरी आले, तरी आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करू. संजय राऊत यांच्या विधानाला फार महत्त्व देण्याची गरज नाही. कालच एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटच्या दालनात सुनील तटकरे आणि जयंत पाटील बसले होते. त्यावेळी तटकरे गेल्यानंतर मी स्वतः जयंत पाटील यांना म्हणालो की, 'तुमची शिवसेनेशी जवळीक जास्त आहे, तुमच्यासाठी आम्ही आमच्याकडे जागा करू शकतो.' त्यामुळे राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे सरनाईक यांनी सांगितले.(Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Nitesh Rane : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे एमआयडीसी स्थापन करा

पालकमंत्री नितेश राणेंचे उद्योगमंत्र्यांना निवेदन; २८ एकर शासकीय जमिनीवर उद्योग केंद्र उभारण्याची

Monsoon Update : यंदाच्या पावसाळ्यात 1 जूनपासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस

रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या

Chandrashekhar Bawankule : सोलापूरचा सव्वाशे वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटला

४० हजार नागरिकांच्या लाभ; १९८९ च्या रेडी रेकनरच्या अवघ्या अडीच टक्के शुल्कात मिळणार मालकी हक्क मुंबई(Mumbai) :

Devendra Fadnavis : फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी घेतली बैठक; सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश   मुंबई :

Pravin Darekar : वक्फ बोर्डाचा लेखा परीक्षण अहवाल १७ वर्षांपासून प्रलंबित

 दरवर्षी अहवाल सादर करणे बंधनकारक; २००८ पासून आजतागायत हिशेब न दिल्याने कारवाई करा मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ

Maharashtra Rain Update : राज्यात १ जूनपासून सरासरी ३३२ मिमी पावसाची नोंद; २४ तासांत रायगडमध्ये सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय असून १ जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरी (Average) ३३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.