Tuesday, July 7, 2026

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ

पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर (Palghar) जिल्ह्यातील वांद्री धरण परिसरातील धबधब्यावर मोठी दुर्घटना टळली. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना अवघ्या दोन मिनिटांत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे जीव मुठीत धरावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पावसाळी पर्यटनातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.

व्हिडिओमध्ये सुरुवातीला महिला, लहान मुले आणि इतर पर्यटक धबधब्याच्या पाण्यात आनंद घेताना दिसतात. मात्र काही क्षणांतच डोंगरावरून पाण्याचा वेग अचानक वाढला आणि पाण्याचा प्रवाह चिखलमय झाला. वाढत्या प्रवाहामुळे अनेक पर्यटक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करताना दिसले. काहींनी एकमेकांचे हात धरून स्वतःचा तोल सावरत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. (Vandri Dam Waterfall)

या संकटाच्या वेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. प्रवीण नावाच्या स्थानिक तरुणासह ग्रामस्थांनी धाडस दाखवत पाण्यात अडकलेल्या महिला, मुले आणि इतर पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनीही बचावकार्यात हातभार लावल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Rescue Team)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या व्यक्तीने हा प्रकार जनजागृतीसाठी प्रसिद्ध केल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी क्षणार्धात वाढू शकते. त्यामुळे रील्स, फोटो किंवा पिकनिकसाठी अशा धोकादायक ठिकाणी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)

दरम्यान, राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनाने धबधबे, नद्या आणि पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >