Friday, July 3, 2026

Rain deaths : मुसळधार पावसात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Rain deaths : मुसळधार पावसात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, गेल्या काही दिवसांत विविध दुर्घटनांमध्ये ६ जणांचा बळी गेला आहे. पावसाच्या जोडीला प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथील गोमती वैशाली चाळीत शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. या आगीमुळे पसरलेल्या विषारी धुरामुळे ७५ वर्षीय सलीम तडवी आणि ६७ वर्षीय मुमताज तडवी या ज्येष्ठ दांपत्याचा गुदमरून मृत्यू झाला. तर मुंब्रा येथील कौसा परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या असुरक्षित वायरमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे खेळत असताना दोन वर्षीय सोहम लखन कसबे हा चिमुकला सांडपाणी प्रकल्पाच्या उघड्या खड्ड्यात पडून मरण पावला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे विनाबॅरिकेड्स उघडे ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदरमध्ये(Mira bhaydar) मंगळवारी झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील (३२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुलचे वडील माजी उपनगराध्यक्ष असून, शहरातील धोकादायक झाडांच्या छाटणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील जांभळे गावात कल्याणमधील ५० वर्षीय अरुणा कुलकर्णी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ जून रोजी टिटवाळा येथून दर्शन करून परतताना 'गुगल मॅप(Google Map)'ने दाखवलेल्या अपूर्ण आणि धोकादायक उरण बंदर-बडोदे महामार्गावरून जात असताना, पुलावरील मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. हा मार्ग वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला नसतानाही तो जीपीएसवर दिसत असल्याने अनेक चालक बळी पडत आहेत.

तत्पुर्वी साकीनाका भागात दुरुस्तीच्या कामासाठी उघडे ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला असून, विधानसभा अध्यक्षांनी दोषींवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या घटनेत, चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवीन दुर्घटनांची मालिका सुरू आहे.

मुंबईसह राज्यभरात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासन आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. "मुंबईकरांचे किती बळी घेणार?" असा सवाल करत विरोधी पक्षांनी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले आहे. अनेक ठिकाणी नाले दुरुस्तीचे काम, रस्त्यावरील खड्डे आणि विद्युत उपकरणांची देखभाल योग्यरित्या न झाल्याने हे मृत्यू ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दादर, सायनसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चितीची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा