Wednesday, July 1, 2026

Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील (Mumbai) कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव बुधवारी ०१ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. त्यामुळे हा तलाव भरला तरी याचा मुंबईला काहीही फायदा नाही. (Powai Lake)

मागील चार दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर अर्थात ५४५५ दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. गतवर्षी हा तलाव १८ जून२०२५ रोजी आणि त्यानंतर ८ जुलै २०२४ रोजी भरून वाहू लागला होता.

मात्र, आता पर्यंत हा तलाव जुलै महिन्यात भरला जात होता. परंतु मागील वर्षी प्रथमच जून महिन्यातच हा तलाव भरला होता. तर यंदा हा तलाव १ जुलै रोजी भरल्याने पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना मोठ्या भरतीच्या दिवशी तसेच मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये भीतीच्या छायेखाली राहावे लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >