Wednesday, July 22, 2026

भारतात टेलिकॉम ग्राहकसंख्या १३४.३१ कोटींवर

भारतात टेलिकॉम ग्राहकसंख्या १३४.३१ कोटींवर

भारतातील दूरसंचार क्षेत्राची वाढ कायम असून, मे २०२६ मध्ये देशातील एकूण टेलिकॉम ग्राहकसंख्या १३४.३१ कोटींवर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) ताज्या अहवालानुसार, एप्रिलमधील १३३.७५ कोटींवरून मे महिन्यात ग्राहकसंख्येत सुमारे ५६ लाख (०.४२ टक्के) वाढ झाली.

देशातील वाढीचा प्रमुख वाटा वायरलेस सेवांचा असून, वायरलेस ग्राहकांची संख्या १२९.४४ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये ११४.५८ कोटी मोबाईल, १३.११ कोटी M2M (मशीन-टू-मशीन) आणि १.१७ कोटी फिक्स्ड वायरलेस ग्राहकांचा समावेश आहे. M2M सिमचा वापर स्मार्ट मीटर्स, फ्लीट ट्रॅकिंग, व्हेंडिंग मशीन आणि सुरक्षा प्रणालींसारख्या तंत्रज्ञानाधारित सेवांमध्ये केला जातो.

एकूण ग्राहकसंख्येत रिलायन्स जिओ ५२.९६ कोटी ग्राहकांसह अव्वल असून, त्यानंतर भारती एअरटेल (३७.६० कोटी), व्होडाफोन आयडिया (१२.९० कोटी) आणि बीएसएनएल (२.७० कोटी) यांचा क्रमांक लागतो. मात्र, मे महिन्यात नवीन ग्राहक जोडण्याच्या बाबतीत एअरटेलने आघाडी घेत २९.८० लाख ग्राहक जोडले, तर जिओने २२.५५ लाख नवीन ग्राहकांची भर घातली. डिजिटल सेवा, ५जी आणि IoT च्या वाढत्या वापरामुळे आगामी काळात दूरसंचार क्षेत्राची वाढ आणखी वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा