Saturday, June 27, 2026

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान

मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या वनक्षेत्राला बेकायदेशीर वृक्षतोड आणि लाकूड तस्करांच्या टोळ्यांनी पुरते पोखरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या वनहद्दीतील तब्बल साडेतीन लाखांहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली असून, यामध्ये सव्वा लाख मौल्यवान सागवान वृक्षांचा बळी गेला आहे. यामुळे शासनाचे ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, राज्याच्या वनवैभवाचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

विधिमंडळात उपस्थित झालेल्या तारांकित प्रश्नाला वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी छापील उत्तर दिले, त्यातून ही माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेनगाव वनउपक्षेत्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात सागवानाची तस्करी झाल्याचे वनमंत्र्यांनी मान्य केले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागांतर्गत काठापूर बुद्रुक आणि शिंगवे या गावांच्या वनक्षेत्रात अतिशय औषधी अशा 'खैर' प्रजातीच्या ६१ झाडांची (61 trees) कत्तल झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगावच्या यावल वनविभागातील पाडळसा शिवारात मालकी हक्काच्या ३० झाडांची अवैध तोड झाली, तर नाशिकच्या पेठ वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचे ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

'टास्क फोर्स' तैनात असतानाही वृक्षतोड

सिंधुदुर्गमधील इको सेन्सिटिव्ह गावांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स असतानाही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप या तारांकित प्रश्नात करण्यात आला. मात्र वनमंत्र्यांनी त्याचा इन्कार केला.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स कार्यरत आहे. या टास्क फोर्सकडे प्राप्त तक्रारींच्या आधारे आतापर्यंत २ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात आतापर्यंत ८२० वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली असून, प्रलंबित राहिलेल्या १३ प्रकरणांमधील वृक्षांची पुनर्लागवड चालू २०२६ च्याच पावसाळ्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >