Sana Malik : सना मलिक यांच्या 'कुराण'समर्थक भूमिकेपासून राष्ट्रवादीने काढले अंग

विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही; सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट


मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 'तिहेरी तलाक' आणि 'समान नागरी कायद्या'वरून 'कुराण'समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या आमदार सना मलिक यांच्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली. देशभरातून याबाबत टीका होऊ लागल्यानंतर राष्ट्रवादीने सना मलिक यांच्या भूमिकेपासून अंग काढले आहे. "आमदार सना मलिक यांनी विधिमंडळात केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आणि संसदेच्या कायद्यालाच सर्वोच्च मानतो," अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.


तटकरे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जात, धर्म किंवा पंथ बाजूला ठेवून महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभा राहिला आहे. कोणत्याही महिलेवर केवळ एका बाजूने, अन्यायकारक पद्धतीने वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याची टांगती तलवार असू नये, हीच पक्षाची कायमची भूमिका आहे. आमचा पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तिहेरी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि देशाच्या संसदेने संमत केलेला कायदा हाच आपल्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्याचे पालन आपण सर्वांनी केलेच पाहिजे. तथापि, लोकशाहीत आमदार म्हणून सना मलिक यांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले, तरी ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.



२३ जून रोजी विधानसभेत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील एका तिहेरी तलाकच्या प्रकरणाचा दाखला देत लक्षवेधी सूचना मांडली होती. "पाकिस्तानात जर बहुपत्नीत्वावर कायदेशीर बंधने आहेत, तर भारतात ती का नाहीत? राज्य सरकार महाराष्ट्रात समान नागरी कायदा कधी लागू करणार?" असा सवाल फरांदे यांनी केला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, "राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लवकरच विशेष समिती स्थापन केली जाईल," असे आश्वासन दिले.


या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी भाजपला लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, "पाकिस्तानने काही नवीन कायदा केलेला नाही, त्यांनी केवळ कुराणच्या नियमांची अंमलबजावणी केली आहे. आमचीही हीच मागणी आहे की, भारतातही मुस्लिमांसाठी कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. तसेच, फक्त मुस्लिम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात असे नाही, इतर धर्मांतही बहुपत्नीत्वाची उदाहरणे आहेत."



विधानसभेत नेमके काय घडले?


- सना मलिक यांच्या या 'कुराण'समर्थक भूमिकेवर भाजप आणि शिवसेना आमदारांनी संताप व्यक्त केला. "हा देश फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, इथे कुराणचा कायदा चालणार नाही," अशा शब्दांत सत्ताधारी आमदारांनी मलिक यांना ठणकावले.
- विशेष म्हणजे, जेव्हा सत्ताधारी बाकांवरून सना मलिक यांना बोलण्यापासून रोखले जात होते, तेव्हा विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी सना मलिक यांच्या बाजूने उभे राहत त्यांना पाठिंबा दिला.
- "त्यांचे मत कुणाला आवडो वा न आवडो, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सभागृहात बोलण्यापासून रोखणे पूर्णपणे चुकीचे आहे. मी त्यांच्या भूमिकेला समर्थन देतो," असे जयंत पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम