Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा जवानांची नावे केंद्र सरकारने प्रथमच अधिकृतपणे जाहीर केली आहेत. या घोषणेमुळे देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात असून त्यांच्या शौर्याची कायमस्वरूपी नोंद राष्ट्रीय युद्ध स्मारकावर केली जाणार आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या भ्याड हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिक घोडावाल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतीय सशस्त्र दलांनी कठोर भूमिका घेत ७ मेच्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून भारताने मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सहा जवानांची नावे आता प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहेत.
Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना आयर्लंडच्या बेलफास्ट ...
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेले सहा जवान
ऑपरेशनदरम्यान शहीद झालेल्यांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे.
सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड
रायफलमन सुनील कुमार – ४ थी बटालियन, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट
लान्स नाईक दिनेश कुमार – ५ वी फील्ड रेजिमेंट
अग्निवीर मूड मुरली नायक – ८५१ वी लाइट रेजिमेंट
हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ वी फील्ड वर्कशॉप
सार्जंट सुरेंद्र कुमार – ३९ विंग, भारतीय हवाई दल
शौर्याचा गौरव; वीर चक्र आणि वायू पदकाने सन्मान
देशासाठी अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच भारतीय हवाई दलातील सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर वायू पदकाने गौरविण्यात आले आहे. या दोन्ही जवानांच्या शौर्याला देशाने सलाम केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel) वापरला जाणारा अधिकृत प्रवास दस्तऐवज ...
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कायमस्वरूपी कोरली जाणार नावे
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या या सहाही जवानांची नावे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे विशेष ग्रॅनाइट फलकांवर कायमस्वरूपी कोरली जाणार आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीरांना हा राष्ट्राचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.
काय होते ‘ऑपरेशन सिंदूर’?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक लष्करी कारवाई केली. या मोहिमेत शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला असून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. सलग तीन दिवस दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती कायम राहिल्यानंतर १० मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू झाली.
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला नवी धार दिली, तर या मोहिमेत बलिदान देणाऱ्या सहा जवानांचे शौर्य देशाच्या इतिहासात कायमस्वरूपी सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.