Thursday, June 25, 2026

Minister Uday Samant : सिडको परिसरातील जलप्रदूषणाची होणार सखोल चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन

Minister Uday Samant : सिडको परिसरातील जलप्रदूषणाची होणार सखोल चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन

एमपीसीबीमार्फत सर्व तलावांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे विधान परिषदेत निर्देश

मुंबई : सिडको परिसरातील तलावांमधील पाणी प्रदूषणाच्या समस्येची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) माध्यमातून परिसरातील सर्व तलावांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती उद्योग, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे पनवेल आणि आसपासच्या परिसरातील प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. पनवेल परिसरातील जलस्रोतांमध्ये दूषित पाणी किंवा रासायनिक द्रव्ये मिसळल्यामुळे काही पशुंना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रदूषणाचा फटका पनवेलसह खारघर, कळंबोली, तळोजा, नागझरी, पेंढर आणि लगतच्या क्षेत्रातील जलस्रोतांना बसत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती. डंपिंग ग्राउंड व इतर ठिकाणांहून येणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

आमदार विक्रांत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मंत्री सामंत म्हणाले की, गोसंवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे सिडको आणि पनवेल परिसरातील जलप्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी 'एमपीसीबी'ला तात्काळ सर्व तलावांचे नव्याने वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. या सर्वेक्षणाचा स्वतंत्र व सविस्तर अहवाल निश्चित वेळेत शासनाला सादर केला जाईल.

दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रशासकीय स्तरावर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती काम करेल. ही समिती डंपिंग ग्राउंडचे व्यवस्थापन, सांडपाण्याची विल्हेवाट आणि जलस्रोत प्रदूषित होण्यामागची तांत्रिक कारणे तपासणार आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संबंधित यंत्रणेवर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले. या निर्णयामुळे सिडको परिसरातील तलावांचे पुनरुज्जीवन होण्यास आणि नागरिकांना प्रदूषणातून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा