जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै
आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उदाहरणार्थ संचित म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे काय? क्रियमान म्हणजे काय? पापपुण्य म्हणजे काय? नियती कशी निर्माण होते? नशीब कसे तयार होते? एवढा मोठा हा विषय आहे. या विषयाच्या संदर्भात लोकांमध्ये प्रचंड अज्ञान आहे, गैरसमज आहेत, अंधश्रद्धाही खूप आहेत. आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधी आहोत त्यामुळे अंधश्रद्धेचा प्रश्नच इथे येत नाही. आपला जो जीवनप्रवास आहे तो कसा चालतो. ह्या जीवनप्रवासात आपण नेमके काय केले पाहिजे? जेणेकरून आपला प्रवास सुखावह होईल. म्हणून हा विषय आपण घेतलेला आहे. आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात संचितापासून होते. संचितातून प्रारब्ध, प्रारब्धातून क्रियमाण. क्रियमाणातून पापपुण्य, पापपुण्यातून नियती, नियतीतून सुखदुःख किंवा नशीब असा हा जीवनप्रवास आहे. प्रवास करताना आपण रिझर्वेशन करतो व प्रवासाला निघतो तेव्हा आपला प्रवास हा सुखाचा होतो. तसे आपला जीवनप्रवास सुखाचा होण्यासाठी रिझर्वेशन केले पाहिजे. अर्थात वेगळा विषय डोक्यात आणू नका. रिझर्वेशन म्हणजे प्रवासांत ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टींचे नियोजन, योजना, आखणी. मुक्कामाला गेल्यावर कुठे भेटायचे? कोणाला भेटायचे? याचा विचार करतो तेव्हा प्रवास सुखाचा होतो. याउलट नियोजन नसेल, आखणी नसेल किंवा योग्य अशी योजना नसेल तर अशा लोकांच्या वाट्याला मात्र दुःखाशिवाय काहीहो येत नाही. चरफड आणि धडपड याशिवाय त्यांच्या वाट्याला इतर काहीही येत नाही. म्हणून हा प्रवास नेमका सुखाचा होण्यासाठी नक्की काय केले पाहिजे? तर हा विषय नीट समजावून घेऊन त्यानुसार योग्य ते आचरण केले पाहिजे. आता संचित ते नशीब ह्या सर्व साखळीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय कोणता? तसे या संदर्भातील सर्वच विषय अत्यंत महत्त्वाचे असले तरी त्यातल्या त्यात क्रियमाण हा विषय इतर विषयांपेक्षा जरा जास्त महत्त्वाचा. कारण क्रियमाण करत असताना आपण एका बाजूने आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध हे भोगत असतोच, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने आपण नियती निर्माण करत असतो. सांगायचा मुद्दा, ह्या अशा आपल्या जीवनाशी अत्यंत जवळच्या असलेल्या विषयाचे संपूर्ण ज्ञान हे योग्य त्या अधिकारी ज्ञानी व्यक्तींकडून म्हणजेच सद्गुरूंकडून लवकरात लवकर मिळवणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, "सद्गुरुवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी !!". जीवनप्रवास सुखाचा करण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे.





