Wednesday, June 24, 2026

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

Maharashtra wedding card new rule  : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल

महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage) रोखण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख (Date Of Birth) आणि वय नमूद करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या लग्नपत्रिकांमध्ये वधू-वरांची नावे, विवाहस्थळ आणि कार्यक्रमाची माहिती दिली जाते. मात्र, नव्या प्रस्तावानुसार वधू आणि वर यांच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख आणि वय छापणे आवश्यक ठरू शकते. यामुळे विवाहासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय पूर्ण झाले आहे की नाही, हे सहज तपासता येणार आहे.

राज्यातील काही भागांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे अहवाल समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय विचाराधीन घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो, असा प्रशासनाचा विश्वास आहे.(Maharashtra wedding card new rule)

राजस्थानमध्ये यासंदर्भातील उपक्रम राबविण्यात आल्यानंतर त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातही अशा प्रकारचा नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या देशात लागू असलेल्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे किमान वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे किंवा विवाहास मदत करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.'

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असून दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विवाह लावणारे, विवाह ठरवणारे, तसेच बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई होऊ शकते.

दरम्यान, या प्रस्तावाबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नसली तरी लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा