Tuesday, June 23, 2026

Nashik : भावडबारी घाटात पहिल्याच पावसात दरड कोसळली; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nashik : भावडबारी घाटात पहिल्याच पावसात दरड कोसळली; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि देवळा तालुक्यांना जोडणाऱ्या भावडबारी घाटात (Bhavdbari Ghat) पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विंचूर–प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील (Vinchur-Prakasha National Highway) या घाटमार्गाचे नुकतेच रुंदीकरण आणि वळण सुधारणा काम करण्यात आले असले, तरी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिकांकडून केला जात आहे.

डोंगरकड्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष ?

विंचूर–प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग (Vinchur-Prakasha National Highway) हा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग असून, चांदवडजवळील सोग्रस गावापासून देवळा, सटाणा आणि नंदुरबारकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी भावडबारी घाट महत्त्वाची भूमिका बजावतो. घाटातील धोकादायक वळण कमी करण्यासाठी डोंगर फोडून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत झाली असली, तरी डोंगरकड्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे.

पहिल्याच पावसात दरड कोसळली

रविवारी (दि. २२) सायंकाळी झालेल्या पावसानंतर घाटातील ढिसूळ दगड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने आगामी पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या मते, घाटातील डोंगरकड्यांवर संरक्षक लोखंडी जाळी बसविणे आवश्यक होते. मात्र, रुंदीकरणाच्या कामादरम्यान ही उपाययोजना न केल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने घाट परिसरात संरक्षक जाळी बसवून दरड कोसळण्याचा धोका रोखावा, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, किरण मोरे तसेच इतर वाहनधारकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. आगामी पावसाळ्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

“राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी दरम्यान असलेल्या रस्त्यावर भावडबारी घाट रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. म्हसोबा देवस्थानच्या दोन्ही बाजूला अद्याप घाटकटिंगचे काम रखडले आहे. म्हसोबा महाराजांच्या जागेचे योग्य जागेवर सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन वेळेवर करणे अंत्यंत गरजेचे आहे. तसेच घाटरस्ता हा सरळ पद्धतीने कट केला असल्याने पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वेळोवेळी घडुन जिवितहानी होउ शकते. त्यावर उपाय म्हणून त्वरीत लोखंडी जाळ्या व काही ठिकाणी कठडे उभे करणे गरजेचे आहे. या घाटमार्गावर तात्काळ संरक्षक जाळी लावून रस्ता संरक्षित करावा अन्यथा त्याच जागेवर रास्ता रोको आंदोलन करून निषेध केला जाईल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी इशारा दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा