Monday, June 22, 2026

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण
मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू केली आहे. आज कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगडमधील अलिबागपर्यंत मान्सून पोहोचला. मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर पार करत तो पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि पुणे शहरापर्यंत दाखल झाला आहे. तसेच दक्षिण अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड भागातही त्याची चाहूल लागली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा मोठा भाग मान्सूनच्या प्रभावाखाली आला आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्र शाखेने तेलंगणातून पुढे सरकत दक्षिण विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत मजल मारली आहे. जरी या सर्व भागांमध्ये सर्वत्र पावसाची जोरदार नोंद झाली नसली, तरी मान्सूनी वाऱ्यांनी हजेरी लावली आहे. वातावरण सध्या अनुकूल असून येत्या २–३ दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून सध्या तो पंजाब-हरियाणाऐवजी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातून जात आहे. त्याचबरोबर वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. अरबी समुद्रात सुमारे ३.५ ते ४ किमी उंचीवर असलेली प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली कमजोर झाली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळ मिळून महाराष्ट्रात त्यांची प्रगती वेगाने होत आहे. शुक्रवार, २६ जूनपर्यंत विदर्भातील वातावरणात उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, अशी माहिती आयएमडी पुणे या संस्थेने दिली आहे.
दोन आठवड्यांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थिर असलेल्या मान्सूनने आज पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुंबईसह राज्यातील इतर भागात लवकरच मान्सूनची वाटचाल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यात सध्या तुरळक ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. यंदा तळकोकणात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. साधारणपणे १५ ते २० जूनच्या आसपास राज्यातील बहुतांशी भागात मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरीही राज्यात समाधानकारक पाऊस नोंदला गेला नाही. दरम्यान, रविवारपासून हवामानात बदल होत असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >