कथा-रमेश तांबे
एक होतं भूत. त्याला रोज रोज स्मशानात राहायचा खूप कंटाळा आला होता. तो म्हणायचा, काय हे आमचे जीवन. या इथे स्मशानात राहायचं. रोज जळणारी प्रेतं आणि रडणारी माणसं बघायची. शिवाय ना कुणाला दिसायचं, ना कुणाला मदत करायची. काय उपयोग आहे एवढ्या बुद्धीचा आणि शक्तीचा? हे काही नाही. आपण माणसं राहतात त्यांच्यासोबत राहायचं. कुठे काय चाललंय ते पाहायचं. चुकीचं घडत असेल, तर ते थांबवायचं. कुणी संकटात असेल तर त्याला मदत करायची. ठरलं तर मग! सर्वांचा निरोप घेऊन, सर्वांना टाटा करून भूत निघालं लोकांमध्ये राहायला. जुन्या जाणत्या भुतांनी त्या तरुण भुताला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते न ऐकताच निघून गेले.
मग भूत निघालं उडत उडत. कधी हसत, कधी ओरडत. मजा करत करत ते पोहोचले माणसाच्या वस्तीत. त्यानं पाहिलं एका मैदानात क्रिकेट खेळ रंगात आला होता. तेवढ्यात एकाने आकाशात उंच चेंडू मारला.भुताने तो वरच्यावरच पकडला आणि तो अलगद क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुलाच्या हातात दिला. फलंदाज बाद झाला. पण हे विपरीत कसे घडले? सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात कसा आला, हे कुणालाच कळले नाही. मग एकच जल्लोष झाला आणि भूत तेथून निघाले.एका मिठाईच्या दुकानाबाहेर एक भिकारी भुताला बसलेला दिसला. पण त्याचे ताट मात्र रिकामेच होते. भुताला त्याची दया आली. त्याने लगेचच त्या गरीब माणसाचे ताट वेगवेगळ्या मिठाईने भरून टाकले. त्या गरीब माणसाचा आनंदी चेहरा बघत बघत भूत पुढे निघाले. अशा प्रकारे अनेकांना मदत करत भुताचा दिवस आनंदात चालला होता.
पुढच्या चौकात खूपच गर्दी होती. चार-पाच जणांची टोळी एका तरुणाला बेदम मारत होती. ते दृश्य अनेक जण बघत होते. पण पुढे कोणीच येईना. मग भुताने एकाला ठोसे मारायला सुरुवात केली. कुणालाच कळेना ठोसे कोण मारतंय? मग त्यांचीच आपापसात जुंपली. आपल्याला मारणारेच आपापसात मारामारी करत आहेत हे पाहून त्या तरुणाने तेथून हळूच पळ काढला.आता भुताला खूपच भूक लागली होती. मग कुठे जावे, काय खावे हा विचार करीत असतानाच त्याला समोरच केळ्याची गाडी दिसली. दोन-चार लोक केळी विकत घेत होते. मग काय भुताने सरळ केळ्यांची एक फणी उचलली आणि एक एक केळे साल काढून खाऊ लागला. केळीवाला ते विचित्र दृश्य बघून चांगलाच घाबरला. कारण केळी हवेत तरंगत होती आणि साली खाली पडत होत्या. हे पाहून तो केळीवाला घाबरून गेला आणि गाडी सोडून पळत सुटला. आजूबाजूचे केळी घेणारेही घाबरून पळत सुटले. त्यांची घाबरगुंडी बघून भूत खदखदा हसत सुटले. भरपेट केळी खाऊन भूत पुढे निघाले. पुढे जाताच भुताला एक शाळा दिसली. तिथे परीक्षा सुरू होती. मग भूत एका वर्गात शिरले. त्याने सगळीकडे नजर फिरवली. सर्व मुले मान खाली घालून पेपर लिहीत होते. भुताला वाटले आपणही परीक्षा द्यावी. आपण भूत आहोत. आपल्याला कुठलीही गोष्ट कठीण नाही. मग त्याने सरांच्या टेबलवरची एक प्रश्न पत्रिका उचलली आणि ती वाचू लागला. पण भुताला काहीचकळेना. कारण तो होता गणिताचा पेपर!आपल्याला गणित काहीच कळत नाही, या विचारांनी भूत एकदम काळजीत पडले. ही माणसांची छोटी छोटी मुलं भरभर गणितं सोडवतात अन् आपल्याला येत नाही म्हणजे काय! मग भुताने गणिताची पन्नास पुस्तकं गोळा केली. अन् वाचताना कुणाचाही त्रास नको, गडबड गोंधळ नको म्हणून परत स्मशानात गेला. शांत-निवांत अभ्यास करण्यासाठी! त्यानंतर भूत परत कधीच माणसांना दिसलं नाही. कारण ते अजूनही गणित समजून घेत बसलं आहे!