Sunday, June 21, 2026

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये तणाव, पण भारत निर्धास्त! लाखो टन कच्चे तेल घेऊन ३ जहाजे भारताकडे रवाना

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये तणाव, पण भारत निर्धास्त! लाखो टन कच्चे तेल घेऊन ३ जहाजे भारताकडे रवाना

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील (Strait of Hormuz) अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन कच्चे तेलवाहू टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले असून ते भारतातील बंदरांकडे मार्गस्थ झाले आहेत. केंद्रीय नौवहन, बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.

अमेरिका-इराण तणाव आणि प्रादेशिक संघर्षांमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना ही घडामोड भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. (Strait of Hormuz)

तीन टँकर भारताकडे; लाखो टन कच्चे तेल सोबत :

केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, 'देश वैभव' हा टँकर २४ जून रोजी गुजरातमधील वडीनार बंदरात पोहोचणार आहे. या जहाजात २.८६ लाख मेट्रिक टनांहून अधिक कच्चे तेल असून ३७ भारतीय खलाशी कार्यरत आहेत. तसेच 'देश विभोर' हे दुसरे जहाज २४ जूनलाच गुजरातमधील सिक्का बंदरात दाखल होणार आहे. या टँकरमध्ये जवळपास २.८९ लाख मेट्रिक टन कच्चे तेल आहे. (Strait of Hormuz)

दरम्यान, 'सन्मार हेराल्ड' हे तिसरे जहाज पूर्व किनाऱ्यावरील पारादीप बंदराच्या दिशेने रवाना झाले असून १ जुलैपर्यंत ते भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजावर ३० भारतीय खलाशी असून त्यात २.८५ लाख मेट्रिक टन कच्चे तेल आहे. या तिन्ही जहाजांमधून एकूण ८.६० लाख मेट्रिक टनांहून अधिक कच्चे तेल भारतात येत असून त्यावर ९४ भारतीय कर्मचारी कार्यरत आहेत. (Strait of Hormuz)

भारताच्या ऊर्जा सुरक्षेला सरकारचे प्राधान्य :

केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण आणि ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सर्वोच्च प्राधान्याने काम करत आहे. संवेदनशील परिस्थितीतही भारतीय जहाजे सुरक्षितपणे मार्गस्थ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. (Strait of Hormuz)

पुन्हा वाढला होर्मुझवरील तणाव :

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र इस्रायल-लेबनॉन संघर्ष कायम असल्याने परिसरातील तणाव पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतुकीवर पुन्हा निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. कराराच्या अटींचे उल्लंघन सुरू राहिल्यास आणखी कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही इराणने दिला आहे. (Strait of Hormuz)

भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत :

काही दिवसांपूर्वी ओमानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतात संताप व्यक्त करण्यात आला होता. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत उपस्थित केल्याची माहिती समोर आली होती. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीवर भारताचे बारकाईने लक्ष असून, ऊर्जा पुरवठा आणि भारतीय खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सतत परिस्थितीचा आढावा घेत आहे. (Strait of Hormuz)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा