Friday, June 19, 2026

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून..

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या प्रवाहामुळे यातील जलपर्णी आणि मगरींचा त्रास मोठ्याप्रमाणात होत आहे. हा त्रास आता कायमचाच दूर होणार आहे. यातील सांडपाणी प्रवेशाचे मार्ग आता कायमचेच बंद होत आहे. येत्या जून अखेरपर्यंत हे मार्ग पूर्णपणे बंद होवून यातील पाण्याचा दर्जा सुधारला जाणार आहे. परिणामी या तलावातील या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या जलपर्णी आणि मगरींचा त्रास कायमचाच दूर होणार आहे. दरम्यान, या पवई तलावातील पाण्यावर कारंजे बसवले जाणार असून हे काम म्हाडाच्यावतीने केले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

पवई तलावाच्या दक्षिण बाजूस आदि शंकराचार्य मार्गालगत परिसराचा मागील १८ वर्षांपासून विकास रखडलेला असून आता याठिकाणी मेट्रो रेल्वेच्या स्थानकांची कामे पूर्ण होताच याचा विकास करण्यात येत आहे. या परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्यांनतर पर्यटकांसाठी तिकीट आकारणी करण्यात येणार आहे, तसेच अंतर्गत भागांमध्ये फूड कोर्टद्वारे खाद्यपदार्थांची विक्रीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कामासाठी सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव आला असता,सदस्यांनी सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेतला. अश्रफ आझमी यांनी जी सल्लागार कंपनी नेमली त्याचा अनुभव काय आहे असा सवाल याच्या विकासाचा विस्तृत अहवाल सादर करण्याची मागणी केली. तर सईदा खान यांनी पवई तलावातील मगरींना सुरक्षित राणीबागेत स्थलांतरीत करावे अशी सूचना केली. तर यशोधर फणसे यांनी निविदा न काढता यासाठी सल्लागार कसा नेमला जात आहे असा सवाल कर यामध्ये एका विकासकाने मगरी सोडल्याचा आरोप केला. यावेळी झालेल्या चर्चेत शीतल गंभीर, अजंता यादव, मिनाक्षी पाटणकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पवई तलावाची सुधारणा आणि प्रोमिनाड अर्थात विहार पथ आदींची कामे स्वतंत्र होत आहे. या पवई तलाव आणि आदी शंकराचार्य मार्ग मधील जागेचा विकास करण्यात येत असून यामुळे कोस्टल रोडच्या धर्तीवर एक विहार पथ उपलब्ध होणार आहे. या विहार पथाचा विकास खासगी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सीएसआर निधीतून केला जाणार आहे.तसेच पवई तलावाची सुधारणा विविध तज्ज्ञ समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार तथा त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून पवईत ज्या भागातून सांडपाणी प्रवेश होते, ते प्रवेश मार्ग आता बंद करण्यात येत आहेत. यामध्ये १८ दशलक्ष लिटर सांडपाणी अर्थात मलजल येत असते. त्यामुळे ३० जूनपर्यंत हे १८ प्रवेश मार्ग बंद करण्यात येत आहेत. हे सर्व प्रवेशमार्ग शोधून बंद करण्यात येत आहे. येत्या १ जुलैपासून हे प्रवेशमार्ग बंद झाल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह बंद होईल. ज्यामुळे जलपर्णी जी अधिक या पाण्यावर वाढते, ते प्रमाण कमी होईल,असे बांगर यांनी स्पष्ट केले.तसेच तलावातील कारंजे बंद असून हे कारंजे पूर्वव्रत केले जाणार आहेत. या कांरजा बसवण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून केले जाणार आहे,असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा