Thursday, June 18, 2026

प्रारब्ध ते पाप- पुण्य

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’. पंतप्रधानांची सत्ता, मुख्यमंत्र्यांची सत्ता, नगरसेवकाची सत्ता, ऑफिसरची सत्ता, ही सत्ता कशी राबवायची, ही सत्ता अमलात कशी आणायची, या गोष्टीतून सुद्धा पाप-पुण्याची निर्मिती होते. काही वेळेस काही जण ह्या सत्तेचा उपभोग घेत असताना, तिचा दुरुपयोग करतात. तर काही माणसे त्यांच्यापाशी असलेल्या सत्तेच्या वापरातून लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करतात. काही ऑफिसेसमध्ये एखादा ऑफिसर बदली होऊन जाईल अथवा जाईल तर बरा असा विचार त्याच्या हाताखाली काम करणारे लोक करतात. मात्र त्याच वेळी दुसरा एखादा वरिष्ठ अधिकारी तिथेच टिकून राहावा व त्याची कधीही ट्रान्सफर होऊ नये अशी प्रार्थना ही काही लोक करतात. सत्ता ही कितीही असो, थोडी अथवा जास्त, ही सत्ता राबविली कशी जाते, ह्याला महत्त्व आहे. किंबहुना राज्य सुरळीत चालण्यासाठी व राज्याचा उत्कर्ष व उन्नती साधण्यासाठी जे काही राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक असते ते करणे म्हणजे राजकारण होय. राज्य म्हणजे राज्यातले लोक. जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे, जनतेचे कल्याण किंवा अकल्याण करण्याचे सामर्थ्य हे राजसत्तेत असते म्हणूनच जनतेच्या सुस्थितीला किंवा दुर्दैवाला सर्वस्वी राज्यकर्तेच जबाबदार असतात. येथे सत्तेचे महत्त्व अधोरेखित होते. खासदार, आमदार ह्यांच्याकडे लोकांचे भले करण्याचे सामर्थ्य असते. ते खूप पुण्य मिळवू शकतात. अगदी त्यांनाच आयुष्यभर पुरेल इतकेच नाही तर त्याच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्यांच्या आयुष्यभर पुरेल इतक्या पुण्याचा ते संचय करू शकतात. मात्र जर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या व्यसनी निपजतात. अशी व्यसनाधीन व्यक्ती त्याच्या आई-वडिलांना दुःख तर देतेच, पण झालेली पाप निर्मिती पुढील अनेक पिढ्यांपर्यन्त जाते. म्हणूनच प्रत्येकाने जास्तीत जास्त पुण्य मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत करत राहायला पाहिजे. जेव्हा अपयश येते तेव्हा पुण्य कमी पडते. दोन माणसे एकाच नोकरीच्या मुलाखतीसाठी जातात. दोघेही रुबाबदार, दोघेही उच्चशिक्षित, दोघेही हुशार. मात्र नोकरीसाठी निवडला एकच जातो. याचे कारण त्याच्या पदरी जास्त पुण्य होते. ज्याचे पुण्य कमी पडले त्याची निवड आली नाही. पुण्य ही गोष्ट अशी आहे की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणूनच मी नेहमी सांगतो की जे डोळ्यांना दिसत नाही ते किती महत्त्वाचे आहे ? हवा डोळ्यांना दिसत नाही. ती किती महत्त्वाची असते. गुरुत्वाकर्षण शक्ती किती महत्त्वाची आहे, ती ही डोळ्याना दिसत नाही. तसेच विचार ही डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र ते किती महत्वाचे आहेत? तुम्ही जो विचार करता त्या विचारांची क्रिया म्हणजे तुमचे जीवन !! अनुभव, घटना, परिस्थिती हे सर्व तुमच्या विचारांची प्रतिक्रियाच आहे. तुमच्या वाट्याला आलेले जीवन जे तुम्ही जगात आहेत हे इतर काही नसून तुमच्या विचाराची प्रतिक्रिया आहे. या आधी सांगितल्याप्रमाणे जे दिसत नाही ते खूप महत्त्वाचे असते. पाप-पुण्य डोळ्यांना दिसत नाही पण ते महत्त्वाचे आहे. आता पाप मिळवायचे अथवा पुण्य मिळवायचे हे सर्वाथाने तुम्हीच ठरवा कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा