दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश

ऋतुराज-ऋतुजा केळकर


काळच्या दवबिंदूतून झिरपणारा सूर्यकिरण जसा पाण्याच्या थेंबात चमकतो, तसा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. दवबिंदू वेगळा वाटतो, पण तो सूर्याच्या प्रकाशाशिवाय अस्तित्वातच नसतो. तसेच जीव वेगळा वाटतो, पण त्याचा आधार परमप्रकाश आहे. सत्य म्हणजे ते जे कधीही नष्ट होत नाही, जे काळाच्या ओघात बदलत नाही. जसा आकाशातील निळा रंग ढगांनी झाकला तरी आकाश निळेच राहते, तसा आत्म्याचा स्वरूप कायमच शुद्ध आणि अखंड असतो. असत्य हे ढगांसारखे आहे क्षणिक, बदलणारे आणि शेवटी विरघळणारे. पण सत्य म्हणजे आकाशाची निळाई अखंड, शाश्वत आणि सर्वत्र व्यापलेली. मृगजळासारखी भासणारी माया ही फक्त भ्रमाची छाया आहे, तिच्या मागे नेहमीच सत्याचा महासागर दडलेला असतो. सकाळच्या आकाशात पसरलेली धूसर धुके जशी हळूहळू सूर्यकिरणांनी विरघळते, तशीच मनातील भ्रमाची माया सत्याच्या प्रकाशाने नाहीशी होते. समुद्राच्या लाटांवर उसळणारा फेस वेगळा वाटतो, पण त्याच्या तळाशी असते तीच पाण्याची अखंडता. जीवनातही असत्य हे नेहमी सत्यावरच आधारलेले असते. भ्रमाला खरे मानले की मन अस्वस्थ होते, पण तो मृगजळ आहे हे समजले की आत्मा शांत होतो.(NASA Astronaut Anil Menon)



इथे मला एक ससा आणि शेतकऱ्याची कथा आठवते. एका गावात एक शेतकरी राहत होता. रोज सकाळी तो शेतात कामाला जात असे. त्याच्या शेताच्या कडेला एक छोटासा ससा राहत होता. शेतकरी जेव्हा नांगरणी करत असे, तेव्हा ससा दूरून त्याच्याकडे पाहत असे. एका दिवशी शेतकरी थकून झाडाखाली बसला. ससा हळूच जवळ आला आणि म्हणाला, “तू रोज मेहनत करतोस, पण तुझ्या चेहऱ्यावर चिंता का दिसते?”शेतकरी हसला आणि म्हणाला, “मी उद्याच्या पिकाची काळजी करतो. पाऊस पडेल का, धान्य उगवेल का, याची मला भीती वाटते. ससा शांतपणे म्हणाला, “मी रोज गवत खातो, पाणी पितो आणि आकाशाकडे पाहतो. मला उद्याची चिंता नसते कारण, मला ठाऊक आहे की आजचा दिवसच माझा सत्य आहे.” शेतकरी थोडा विचारात पडला. त्याला जाणवलं की तो भविष्याच्या भीतीत अडकला आहे, तर ससा वर्तमानात जगतो आहे. त्या दिवसापासून शेतकरी जेव्हा शेतात काम करत असे, तेव्हा तो सश्याला आठवून स्वतःला म्हणत असे “आजचा दिवसच माझं सत्य आहे.”कसं आहे ना की, एखाद्या रागातला प्रत्येक स्वर हा मुख्य सुरावर आधारलेला असतो. जर तो मूळ स्वर हरवला, तर संपूर्ण राग विसंगत होतो. तसेच प्रत्येक जीव हा एका अदृश्य सुरावर परमप्रकाशावर आधारलेला असतो.जन्माच्या क्षणी उमटणारा स्वर म्हणजे ‘सोऽहं’ मी त्या अखंड प्रकाशाचा अंश आहे. जसजसं आयुष्य पुढे सरकतं, तसा स्वर बदलतो. कधी तो प्रश्नार्थक होतो ‘कोऽहं?’ म्हणजे मी कोण आहे? आणि शेवटी, देहाशी एकरूप झाल्यावर तो विसंगत स्वर उमटतो ‘मी देहच आहे.’ पण जसा रागाचा मूळ स्वर हरवला की संगीतातील माधुर्य नष्ट होतं, तसाच आत्मस्वर हरवला की जीवनात विसंवाद निर्माण होतो. मग मनात भीती, अस्वस्थता, मोह, राग यांचे सूर मिसळतात आणि जीवनाची लय बिघडते. संगीतकाराला जसा प्रत्येक स्वर मूळ सुराशी जोडून ठेवावा लागतो, तसा साधकाला प्रत्येक क्षण सत्याशी जोडून ठेवावा लागतो. कारण मूळ स्वर टिकला की राग सुंदर होतो तसेच आत्मस्वर टिकला की जीवन शांत, गोड आणि माधुर्यपूर्ण होतं.




आता इथे मूळ स्वर किंवा संगीत म्हणजे आपले कर्म होय. जसा रागाचा प्रत्येक स्वर मूळ सुरावर आधारलेला असतो, तसाच जीवनाचा प्रत्येक क्षण कर्मावर आधारलेला असतो. कर्म म्हणजे निसर्गातील ऋतुचक्र. पाऊस आला तर शेत फुलते, उन्हाळा आला तर झाडं कोमेजतात, हिवाळा आला तर पानगळ होते. पण शेतकरी प्रत्येक ऋतूला स्वीकारतो, कारण त्याला ठाऊक असतं की ऋतुचक्र हेच जीवनाचं सत्य आहे. खरतर निष्काम कर्म म्हणजे आलेले सुख दुःख सहजपणे भोगणे. जसा शेतकरी पावसात भिजतो, उन्हात घाम गाळतो, तरीही तो काम थांबवत नाही, तसंच साधकही सुख दुःखात स्थिर राहतो. ज्ञानयुक्त कर्म म्हणजे झाडाला पाणी देताना त्याच्या सावलीचा विचार करणे. म्हणजेच कर्म करताना त्याचा परिणाम इतरांवर कसा होईल, याचा विचार करणे. पण निरासक्त कर्म म्हणजे फुल उमलले तरी त्याचा सुगंध स्वतःसाठी न ठेवता इतरांना देणे. जसा फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो, तसा कर्माचा फलही इतरांच्या हितासाठी असावा.सर्व साधनांचा उद्देश म्हणजे अहंकाराचा विरघळलेला हिमनग. अहंकार हा पर्वतासारखा कठीण असतो, पण नामस्मरणाचा प्रवाह त्याला हळूहळू कुरतडतो. जसा नदीचा प्रवाह पर्वताला कुरतडून शेवटी समुद्रात विलीन होतो, तसा नामस्मरणाचा प्रवाह अहंकार वितळवून जीवाला अखंडतेत विलीन करतो. नाम म्हणजे जीवनाच्या गाण्यातील मुख्य स्वर. त्यातच साधनेचे सार दडलेले आहे.संगीतकाराला जसा प्रत्येक स्वरात परमसंगीत ऐकू येतो, तसा साधकाला प्रत्येक क्षणात परमात्म्याचा स्पर्श जाणवतो. निसर्गाच्या लयीमध्ये, पक्ष्यांच्या गाण्यात, वाऱ्याच्या शिळीत, पाण्याच्या खळखळाटात सर्वत्र एक अदृश्य स्वर दडलेला आहे. तो स्वर म्हणजेच सत्याचा स्पर्श. म्हणूनच, रिकामा वेळ मिळाला की तो या स्वरात, या लयीत, या नामस्मरणात घालवावा. कारण जीवन हे एक गाणं आहे, आणि त्याचा मुख्य स्वर म्हणजे सत्याशी, अखंडतेशी आणि परमात्म्याशी एकरूपता. जसा राग मूळ सुराशी जोडला की त्यात माधुर्य फुलतं, तसंच जीवन सत्याशी जोडलेलं



असेल तर त्यात शांतता, गोडवा आणि अखंड आनंद उमलतो.
अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर,
“दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश...
आकाशातली निळाई अखंड खास...
फुलांच्या सुगंधात सत्याचा वास...
आत्मा परमात्म्याशी एकरूप सर्वत्र प्रवास...”

Comments
Add Comment

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’.

वेळेचा अपव्यय

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत मौल्यवान संपत्ती कोणती, असा प्रश्न विचारला तर बहुतांश

कहत कबीर सुनो भाई साधो...

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी अत्यंत शुभ असा ब्रह्ममुहूर्ताचा समय होता. रात्रीच्या काळोखालाच जणू स्वतःला

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि

विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..." "विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..." "वाद नको नियमांचा, भावच खरी