Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्‍या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्‍ट असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.





भांडुप संकुल येथे मुुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. जुलै २०२८ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी १७ जून २०२६ रोजी या जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यस्‍थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रगतिचा आढावा घेतला. अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, उप आयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्‍तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) चंद्रकांत चौधरी, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.





मुंबईला होणा-या पाणीपुरवठ्याच्‍या मुख्‍यत: दोन प्रणाली आहेत. त्‍यापैकी एका प्रणालीतून तानसा - वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्‍य वैतरणा आणि अप्‍पर वैतरणा या धरणांमधील पाणी जलवाहिन्‍यांच्‍या माध्‍यमातून गुरूत्‍वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये या पाण्‍यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्‍यात येते. दररोज सुमारे २,५०० दशलक्ष लीटर पाणी विविध ठिकाणी असलेल्‍या जलाशयांमार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्‍यात येते. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्‍या जलशुद्धीकरण प्रकल्‍पाचे बांधकाम सुमारे ४३ वर्षांपूर्वी करण्‍यात आले आहे. हा प्रकल्‍प संरचनात्‍मकदृष्‍ट्या कमकुवत झाल्‍याने २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारण्‍यात येत आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पात दररोज २, ००० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्‍यात येणार आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की,भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्‍या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्‍पस्‍थळास बॅरेकेडीग, वीजवाहक तारांच्‍या मनो-यांचे स्‍थलांतरण, वृक्षारोपण आदी कामांना वेग मिळाला आहे. स्‍थापत्‍य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीयकरणाची कामे समांतरपणे सुरू करण्‍यात आली आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून प्रकल्प कामे वेगाने पूर्ण करावीत. खोदकाम, राडारोड्याची वाहतूक यांचे नियोजन करावे, असे निर्देश देण्‍यात आले आहेत. एकूणच, मुंबईकरांची पाण्याची मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.


या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार अधिक गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील वाढ तसेच भविष्यातील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मुंबईच्या दीर्घकालीन जलसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाशी संबंधित सर्व नागरी, स्थापत्य, विद्युत, यांत्रिक व प्रक्रिया अभियांत्रिकी कामांना गती देऊन निर्धारित कालावधीपूर्वी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Atul save : दिव्यांग शाळांच्या नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत; मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : दिव्यांग शाळांच्या ऑनलाईन नूतनीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी, पोर्टलवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Mumbai Water Supply : मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहारनंतर तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake)

Bhandup Bus Accident : भरधाव बेस्ट बसचं भांडुपमध्ये नियंत्रण सुटलं; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

मुंबई : मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात (Accident) घडला. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे विहार तलाव भरला; मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो!

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अखेर मुंबईतील पहिला Vihar (विहार) Lake (तलाव) ओसंडून (Overflow) वाहू