MLA Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी (१६ जून) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वनमंत्री गणेश नाईक यांची तक्रार केली. नाईक हे आपल्या मतदारसंघात घुसखोरी करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे.




सोमवारी (१५ जून) नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विषयक सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमावरून या वादाची ठिणगी पडली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्यामुळे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत आधीच तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच स्थानिक आमदार असूनही आपल्याला विश्वासात न घेता आणि राजशिष्टाचाराला हरताळ फासत हा सोहळा उरकला गेल्याचा आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. ही नाराजी इथेच न थांबवता म्हात्रे यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांकडे नाईक यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला.


या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "२००४ मध्ये मी जेव्हा आमदार नव्हते, तेव्हा गणेश नाईक मला विचारत असत की, मी इथला आमदार असताना तुम्ही मला न विचारता कामे कशी करता? आज तोच प्रश्न मी त्यांना विचारत आहे की, मी या भागाची विद्यमान आमदार आहे, मग मला अंधारात ठेवून तुम्ही कामे कशी काय करू शकता?" असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. कोकण किनारपट्टीवर आगरी आणि ओबीसी समाजाची आपण एकमेव महिला आमदार असून आपल्याला मुद्दाम दुखावले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.



आधी स्वतःचा मतदारसंघ सांभाळा


मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधताना म्हात्रे म्हणाल्या, "तुमच्या स्वतःच्या ऐरोली मतदारसंघात काय चालले आहे ते आधी बघा, तिथले त्रस्त लोक कामे घेऊन माझ्याकडे येत आहेत. आमच्या प्रत्येक चांगल्या कामात खो घालण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी," असा इशारा देत मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री या अंतर्गत वादावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात